Heat Waves: हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या अतिउष्णतेच्या लाटेचा फटका शेती, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राला बसत आहे. या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकार सक्षम उपाययोजना करत असून, आयआयएम, नागपूर येथे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर हिट रेसिलियन्स अँड सस्टेनेबल कुलिंग’ या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथून दूरदृष्यप्रणालीद्वारे या केंद्राचे उद्घाटन केले. हे केंद्र भविष्यात राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेचा (SIDM) महत्त्वाचा भाग म्हणून कार्यरत होईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शेतकरी आणि शहरी नियोजनावर विशेष भर
वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका अल्पभूधारक शेतकऱ्यांना बसत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. “दुष्काळ, गारपीट आणि उष्णतेच्या लाटेमुळे शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याची वेळ येते. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल,” असे ते म्हणाले. या केंद्राच्या माध्यमातून सुरुवातीला ‘उष्णलाट कृती आराखडा’ (Heat Action Plan) आणि ‘शहरी हवामान कृती आराखड्या’चा आढावा घेतला जाईल. तसेच अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येतील.
ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र होणार स्वयंपूर्ण
शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले की, 2030 पर्यंत 52% आणि 2035 पर्यंत 65% ऊर्जा अपारंपरिक स्रोतांतून मिळवण्याचे नियोजन आहे. विशेषतः शेतकऱ्यांना 16,000 मेगावॅट वीज सौर ऊर्जेद्वारे देण्याचा प्रयत्न सुरू आहे. वाढत्या उष्णतेमुळे एसीचा वापर वाढून पर्यावरणाचे नुकसान होऊ नये, यासाठी बांधकाम क्षेत्रात पर्यावरणपूरक उपाययोजनांना प्राधान्य दिले जाणार आहे.
नागपूरला प्राप्त झाले आंतरराष्ट्रीय महत्त्व
‘नॅचरल रिसोर्सेस डिफेन्स कौन्सिल’ (NRDC) चे अध्यक्ष मनीष बापना यांनी या केंद्राच्या स्थापनेचे स्वागत केले. ते म्हणाले की, “स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वत कूलिंग हे आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचे मुद्दे आहेत. नागपुरातील हे केंद्र केवळ भारतासाठीच नाही, तर जगासाठी एक आदर्श ठरेल.” आयआयएम नागपूर आणि अमेरिकेतील NRDC या आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे या केंद्राला जागतिक दर्जाचे तांत्रिक सहकार्य मिळणार आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेचा विस्तार
केंद्र शासनाच्या धर्तीवर मिहान, नागपूर येथे 184 कोटी रुपये खर्चून ‘राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था’ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये एकूण आठ उत्कृष्टता केंद्रे (Center of Excellence) असतील, ज्यातील एक केंद्र अतिउष्णता आणि शाश्वत शीतकरणासाठी समर्पित असेल. नागपूरचे तापमान दरवर्षी 45°C च्या पुढे जात असल्याने, हे केंद्र शहरातील आरोग्य, पाणी उपलब्धता आणि वीज वापर यांवर होणारे परिणाम कमी करण्यासाठी प्रभावी उपाय सुचवेल. या कार्यक्रमाला आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी आणि आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भिमराया मैत्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


