Avinash Pathak Custody : बीड जिल्ह्यातील बहुचर्चित २४१ कोटी रुपयांच्या भूसंपादन घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना न्यायालयाने १५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बनावट आदेशांच्या माध्यमातून ६८ कोटी रुपयांचा भूसंपादन मोबदला तब्बल ३१० कोटींवर नेल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे.
या घोटाळ्याबाबत उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सतीश धुमाळ यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सहायक महसूल अधिकारी, डेटा एंट्री ऑपरेटर आणि काही वकिलांसह एकूण १० जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. यातील तिघांना यापूर्वीच अटक करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
विशेष तपास पथकाच्या तांत्रिक तपासात अविनाश पाठक यांचा थेट सहभाग समोर आल्यानंतर गुरुवारी त्यांना ताब्यात घेण्यात आले. शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. शिंदे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
तपासादरम्यान पाठक यांनी बदलीनंतरही काही लवाद आदेश जारी केल्याचे नोंदीतून स्पष्ट झाले आहे. हे आदेश त्यांच्या वैयक्तिक लॅपटॉप आणि संगणकावर टाइप करण्यात आल्याचा संशय आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करणे, उर्वरित संचिकांचा शोध घेणे आणि आवाजाचे नमुने तपासासाठी घेणे आवश्यक असल्याचे एसआयटीने न्यायालयात सांगितले.
याशिवाय, पाठक आणि या प्रकरणातील अन्य आरोपी संजय हंगे यांचे लोकेशन बदलीनंतरही एकत्र आढळल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर मांडली. लातूर आणि मुंबईतील ठिकाणांची तपासणी करण्यासाठीही कोठडी आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
या सुनावणीवेळी सरकार पक्षाकडून ॲड. योगेश सरवदे यांनी बाजू मांडली, तर अविनाश पाठक यांच्यातर्फे वरिष्ठ वकिलांनी युक्तिवाद केला. या प्रकरणामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


