लातूर : लातूर जिल्ह्यातील रेणापूर नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या १६ पैकी तब्बल ११ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली असून, तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत या उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. पक्ष नेते चंद्रकांत खैरे यांनी पूर्ण ताकदीने लढण्याचे निर्देश दिले होते, मात्र आंतरिक अडथळ्यांमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.
२०१६ मध्ये स्थापन झालेल्या रेणापूर नगरपंचायतीची २०१७ मधील पहिली निवडणूक भाजपने एकहाती जिंकली होती. त्यानंतर तीन वर्षे प्रशासकाचा काळ गेला. यंदाच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना (दोन्ही गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यात चौरंगी लढत अपेक्षित होती. मात्र ठाकरे गटातील ११ उमेदवारांच्या माघारीमुळे निवडणुकीचे चित्र पूर्णपणे बदलले आहे.
माघार घेतलेल्या उमेदवारांची यादी आणि प्रभाग:
– ललिता बंजारा – नगराध्यक्ष पद
– अनुसया कोल्हे – प्रभाग क्र. ०३
– महेश व्यवहारे – प्रभाग क्र. ०५
– गोविंद सुरवसे – प्रभाग क्र. ०६
– रेखा शिंदे – प्रभाग क्र. ०८
– रेहानबी कुरेशी – प्रभाग क्र. १०
– छाया आकनगीरे – प्रभाग क्र. ११
– राजन हाके – प्रभाग क्र. १२
– धोंडीराम चव्हाण – प्रभाग क्र. १३
– शांताबाई चव्हाण – प्रभाग क्र. १४
– बाबाराव ठावरे – प्रभाग क्र. १७
भाजपला आव्हान देण्यासाठी शिवसेनेला कमजोर केले? लातूर ग्रामीणचे माजी आमदार आणि काँग्रेस नेते धीरज देशमुख यांनी भाजपला आव्हान देण्यासाठी ठाकरे गटाला कमजोर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात सांगितले जाते. स्थानिक पातळीवर ११ उमेदवारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी माघार घ्यायला लावणे ही काँग्रेसचीच खेळी असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या घटनेमुळे ठाकरे गटाच्या निवडणूक रणनीतीत मोठे राजकीय वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. आता चौरंगी लढतीत कोण फायद्यात येईल आणि कोण तोट्यात, याचे गणित पक्षांतर्गत आखले जात आहे.
दरम्यान, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर नगरपरिषद निवडणुकीतही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्ह्यातील भाजपाचे सर्व आमदार एकत्र येत असून, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना राजकीयदृष्ट्या घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. नगरपालिका निवडणुकीत मंत्री बाबासाहेब पाटील यांनी “गद्दारी” केल्याचा आरोप भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. ते भाजप कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत बोलत असताना म्हणाले, “गद्दारांना आता क्षमा नाही.” यामुळे युतीतील बिघाड अधिक तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे.


