जालना : जालना महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू असतानाच भाजपला जोरदार धक्का बसला आहे. मतदानाच्या अवघ्या तीन दिवस आधी भाजपचे माजी नगराध्यक्ष आणि प्रदेश निमंत्रित सदस्य सुनील बापू आर्दड यांनी भाजपला रामराम ठोकत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.
जालना शहरात भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असून प्रचार शिगेला पोहोचला असताना झालेल्या या पक्षांतरामुळे भाजपची अडचण वाढल्याचे मानले जात आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुनील आर्दड यांच्यासारख्या बड्या नेत्याने शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या प्रवेशावेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर, आमदार संजना जाधव तसेच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. भाजपमध्ये घराणेशाही वाढल्याचा आरोप करत सुनील आर्दड यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. एका घरातील दोन जणांना उमेदवारी देत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता.
दरम्यान, जालना महानगरपालिका निवडणुकीत भाजपकडून काही माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने पक्षात मोठ्या प्रमाणावर असंतोष पाहायला मिळत होता. त्याच पार्श्वभूमीवर सुनील आर्दड यांनी भाजपची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला असून, हा भाजपसाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.


