धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा (तुळ) येथे रिन्यू पवनचक्की कंपनी आणि शेतकऱ्यांमधील मोबदल्याच्या वादातून एका २५ वर्षीय गरीब मजुराचा विजेच्या तीव्र धक्क्याने तडफडून मृत्यू झाला. दत्ता हब्बास वाघमारे असे मृत तरुणाचे नाव असून, कंपनीकडून मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांनी वीजतारा कापण्यासाठी त्याला पोलवर चढवल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. तारांमध्ये करंट असल्याची माहिती असतानाही त्याला धोकादायक काम करायला लावल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
मृत दत्ताची बहीण निकिता अक्षय मस्के यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, शेतकरी विद्याधर तानाजी जाधव याने दत्ताच्या घरी येऊन आपल्या शेतातून गेलेल्या पवनचक्कीच्या वीजतारा कापण्याचे काम सांगितले. दत्ता हा इलेक्ट्रीशियन नसून, त्याला अशा कामाचा अनुभव नव्हता. सुरुवातीला त्याने नकार दिला, मात्र “तारांमध्ये करंट नाही, कंपनीची परवानगी घेतली आहे” असे खोटे सांगून आणि हजेरीसाठी ५०० रुपये देण्याचे आमिष दाखवून त्याला सोबत नेले गेले.
ग्रामपंचायतीची शिडी वापरून दत्ताला कंपनीच्या विजेच्या पोलवर चढवण्यात आले. पोलवर चढताच तीव्र विद्युत प्रवाहाचा धक्का बसून तो खाली कोसळला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला प्रथम तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात, नंतर धाराशिव जिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दत्ता हा मजुरी, मिस्त्री आणि बांधकाम काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नातेवाईकांनी शेतकरी विद्याधर जाधव आणि जितेंद्र गुलाब मस्के यांनी जाणीवपूर्वक दत्ताचा जीव धोक्यात घातल्याचा आरोप केला आहे. तक्रारीवरून तुळजापूर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पवनचक्की प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यात होणाऱ्या विलंबामुळे असे वाद वाढत असून, यापूर्वीही धाराशिव आणि परिसरात अशा घटनांची नोंद झाली आहे. या प्रकरणी कंपनी आणि संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.


