लातूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा बांधव बुधवारी (27 ऑगस्ट) मुंबईकडे कूच करत असतानाच लातूरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारच्या वेळकाढूपणाचा आणि मनोज जरांगे यांना वारंवार उपोषणाला भाग पाडण्याचा आरोप करत बळीराम मुळे (वय 35) या तरुणाने शेतात जाऊन विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने त्याचा जीव वाचला असून, सध्या त्याच्यावर लातूरच्या कवठाळे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेने मराठा समाजात हळहळ आणि सरकारविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
अहमदपूर तालुक्यातील शिंदगी बुद्रुक येथील रहिवासी असलेल्या बळीराम मुळे याने मंगळवारी (26 ऑगस्ट) सायंकाळी आपल्या शेतात जाऊन विष प्राशन केले. त्याच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत त्याने लिहिले आहे, “सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सातत्याने वेळकाढूपणा करत आहे. मनोज जरांगे यांना वारंवार उपोषणाला भाग पाडले जात आहे.” या चिठ्ठीने त्याच्या टोकाच्या पावलामागील कारण स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्रांनी त्याला तातडीने लातूरच्या कवठाळे हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
बळीराम मुळे यांचे लग्न झाले असून, त्यांना दोन मुली आहेत. ते आपल्या भावासोबत 10 एकर कोरडवाहू शेती कसतात. गेल्या काही दिवसांपासून ते मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईला जाण्याच्या तयारीत होते. मात्र, सरकारच्या विलंबामुळे निर्माण झालेल्या निराशेने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी दिलेल्या ‘चलो मुंबई’च्या हाकेला प्रतिसाद देत मराठवाड्यासह राज्यभरातील मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईकडे कूच करण्याच्या तयारीत आहे. लातूर जिल्ह्यातून सुमारे 50 हजार समाज बांधव अडीच ते तीन हजार लहान-मोठ्या वाहनांतून मुंबईला रवाना होणार आहेत. गावागावांतून वाहनांचे ताफे तयार झाले असून, प्रवासादरम्यान लागणाऱ्या अन्नधान्यासाठी चिवडा, बुंदी, लाडू यांचा साठा केला गेला आहे. लातूरमधील समन्वयक समितीने सांगितले की, समाज बांधव शिस्तबद्ध पद्धतीने अंतरवली सराटी येथे एकत्र येऊन तेथून मुंबईकडे प्रस्थान करतील.


