मुंबई : निवडणूक आयोगाविरोधातील महाविकास आघाडी आणि मनसे यांच्या ‘सत्याचा मोर्चा’आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. मुंबईत आज (१ नोव्हेंबर) होणाऱ्या या मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर मुश्रीफ म्हणाले की, सदोष मतदारयादींवर निवडणुका घेण्यास आमचाही आक्षेप आहे आणि त्यांची दुरुस्ती करण्यास हरकत नाही.
मात्र, विरोधकांना पराभवाची भीती वाटल्याने निवडणुका पुढे ढकलण्याचा हा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. या विधानामुळे अजित पवार गटाचा एमव्हीए-मनसेच्या सुराशी जुळणारा सूर असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहे.
हसन मुश्रीफ म्हणाले, “आजचा मोर्चा हा इंडिया आघाडीचा आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांचे काय झाले ते आपण पाहिले. सत्याचा मोर्चा म्हणून हा काढला जात असला तरी, मतदारयादी तयार होताना हरकती घेण्याची संधी विरोधकांनी गमावली.
देशाची लोकसंख्या १४० कोटींच्या वर असल्याने काही चुका होतात, पण प्रशासन त्या दूर करेल. सदोष याद्यांवर निवडणुका नकोत, याला आमचाही पाठिंबा आहे,” असे मुश्रीफ म्हणाले. त्यानुसार, ९६ लाख बोगस मतदारांच्या आरोपांवर राष्ट्रवादीचीही कबुली आहे, पण प्रक्रिया पारदर्शक राहावी, अशी अपेक्षा आहे.
“आता निवडणुका घेतल्या तर विरोधकांना पराभव दिसतोय, म्हणूनच ढकलण्याची मागणी. प्रत्येक पक्षाला आंदोलनाचा अधिकार आहे, पण लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एमव्हीएला जास्त जागा मिळाल्या तेव्हा व्हीव्हीपॅटवर शंका नव्हती,” असा टोला मुश्रीफांनी लगावला. मनसेमुळे काँग्रेस आणि एमव्हीएचे जुळवाजुळव कधीच होणार नाही, अशी खोचकी टीकाही त्यांनी यावेळी केली.


