नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच दिल्ली दौरा केल्याने राज्याच्या राजकारणात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. त्या सध्या दिल्लीत दाखल झाल्या असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता असल्याचे वृत्त साम टीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या विलीनीकरणावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अजित पवारांनंतर सुनेत्रा पवारांकडे सूत्रे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) राजकीय सूत्रे सुनेत्रा पवार यांच्या हाती आली आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांकडील अर्थ खाते वगळता उर्वरित महत्त्वाची खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. याशिवाय बीड आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही त्यांना देण्यात आले आहे.
विलीनीकरणाचा निर्णय झाला होता?
दरम्यान, अजित पवारांच्या निधनामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना तात्पुरता ब्रेक लागल्याचे सांगितले जात असले तरी, शरद पवार गटातील काही नेत्यांनी विलीनीकरणाचा निर्णय आधीच झाला होता आणि त्याची घोषणा होणार होती, असा दावा केला आहे. मात्र, या घोषणेपूर्वीच अजित पवारांचे अपघाती निधन झाल्याने प्रक्रिया रखडल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपची भूमिका ठरणार निर्णायक
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हा सध्या एनडीएचा घटक पक्ष असल्याने, दोन्ही राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणासाठी भाजपची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळेच सुनेत्रा पवार या दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी यासंदर्भात चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विलीनीकरणाबाबत भाजपला विश्वासात घेणे गरजेचे असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
रोहित पवारही दिल्लीत
दरम्यान, अजित पवारांच्या अपघातानंतर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अपघाताबाबत काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. रोहित पवार हे देखील सध्या दिल्ली दौऱ्यावर असून, ते काही महत्त्वाच्या राजकीय नेत्यांच्या भेटी घेणार असल्याचे समजते. दिल्लीत ते पत्रकार परिषद घेण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
राजकीय हालचालींना वेग
एकीकडे सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा आणि दुसरीकडे रोहित पवारांची उपस्थिती, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीबाबत तर्क-वितर्कांना वेग आला आहे. विलीनीकरण, नेतृत्वाची दिशा आणि सत्तेतील समीकरणे यावर पुढील काही दिवसांत मोठे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


