मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर आता राज्याचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लागले असताना, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीने राजकीय वर्तुळात नवे वादळ निर्माण केले आहे. उपराष्ट्रपती जगदीश धनकड यांच्या अचानक राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या या पदासाठी एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवार म्हणून जाहीर केले आहे.
ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपने आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) प्रयत्नशील असताना, इंडिया आघाडीनेही आपला उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांच्या रूपाने रिंगणात उतरवला आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा मागितल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
देवेंद्र फडणवीसांचा राजकीय डाव
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचा उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा मिळावा, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी नेत्यांशी संपर्क साधला. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल असल्याने त्यांना स्थानिक पाठबळ मिळावे, अशी फडणवीस यांची रणनीती आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, फडणवीसांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करताना, “आम्हाला तुमचाही पाठिंबा हवाय,” अशी विनंती केली. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांशी कोणताही संपर्क साधला गेला नसल्याचे सांगितले जाते. यामुळे फडणवीस यांचा हा फोन राजकीय रणनीतीचा भाग असल्याची चर्चा आहे.
शक्तिप्रदर्शन करत सुदर्शन रेड्डींचा अर्ज दाखल
दरम्यान, इंडिया आघाडीने उपराष्ट्रपतीपदासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवार म्हणून जाहीर केले. संसद भवनातील निवडणूक कार्यालयात रेड्डी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शरद पवार, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि इंडिया आघाडीतील अन्य प्रमुख नेते उपस्थित होते.
खासदार संजय राऊत यांनी या एकजुटीचे ट्विटद्वारे कौतुक केले. शरद पवार यांनीही ट्विट करत, “ही लढाई संविधान आणि लोकशाहीच्या बळकटीकरणाची आहे. बी. सुदर्शन रेड्डी यांच्यावर आम्हाला ठाम विश्वास आहे,” असे म्हटले आहे. यामुळे ठाकरे गट आणि शरद पवार यांनी इंडिया आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याचे स्पष्ट झाले.
फडणवीसांवर मोठी जबाबदारी
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी फडणवीस यांच्यावर महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधण्याची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एनडीएच्या उमेदवाराला बिनविरोध निवडून आणण्यासाठी फडणवीस महाविकास आघाडीतील (मविआ) वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत आहेत. याचाच भाग म्हणून त्यांनी पवार आणि ठाकरे यांच्याशी संपर्क साधला. मात्र, इंडिया आघाडीने स्वतःचा उमेदवार उभा केल्याने ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.


