Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यातील राजकीय वातावरण शोकाकुल असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये प्रचार न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निवडणुकांमध्ये स्थानिक नेते आणि पदाधिकारी प्रचाराची जबाबदारी सांभाळतील, मात्र मुख्यमंत्री स्वतः कोणत्याही प्रचारसभेत सहभागी होणार नाहीत.
राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. याआधी 5 फेब्रुवारीपर्यंत प्रचारासाठी वेळ देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या सात दिवसांत तब्बल 22 प्रचारसभा नियोजित होत्या. मात्र, अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकही सभा न घेण्याचा निर्णय घेत सर्व प्रचार कार्यक्रम रद्द केले आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखांमध्ये राज्य निवडणूक आयोगाने बदल केला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, याआधी 5 फेब्रुवारीला होणारे मतदान आता 7 फेब्रुवारी रोजी होणार असून, मतमोजणीची तारीखही बदलून 9 फेब्रुवारी करण्यात आली आहे.
अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू
28 जानेवारी रोजी अजित पवार सकाळी खाजगी विमानाने मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. 29 जानेवारी रोजी लाखो समर्थक, कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुनेत्रा पवार राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री
दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी काल राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुंबईतील लोकभवनात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. शपथविधीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी देवगिरी येथे जाऊन सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली.


