मुंबई : मराठवाडा, सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. या संकटात शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (23 सप्टेंबर) मोठी घोषणा केली. “दिवाळीआधी शेतकऱ्यांना संपूर्ण मदत मिळेल आणि प्रचलित निकषांमध्ये शिथिलता आणून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळवून देऊ,” असे आश्वासन त्यांनी दिले.
सरकारने यासाठी 2,215 कोटींचे मदत पॅकेज जाहीर केले आहे. आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री नुकसानग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करून पाहणी करणार असून, शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.
मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान
2.22 लाख हेक्टर शेती उद्ध्वस्तमराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, बीड, लातूर आणि धाराशिव या पाच जिल्ह्यांत 20 सप्टेंबरपासून अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे. 1,140 गावे प्रभावित झाली असून, 2 लाख 55 हजार शेतकऱ्यांच्या 2 लाख 22 हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. यामध्ये 2 लाख 20 हजार हेक्टर जिरायती, 1,023 हेक्टर बागायती आणि 387 हेक्टर फळबागांचा समावेश आहे.
धाराशिवमध्ये 1.5 लाख हेक्टर, तर सोलापूरमध्ये 40 ते 90 हजार हेक्टर क्षेत्र बाधित आहे. एकूण 70 लाख एकर शेतीचे नुकसान नोंदवले गेले असून, जालना आणि नांदेड सर्वाधिक प्रभावित आहेत. शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
सोलापूरमध्ये सीना नदीचा रौद्रावतार
महामार्ग ठप्पसोलापूर जिल्ह्यात सीना आणि भोगावती नद्यांना आलेल्या महापुराने माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, करमाळा आणि परांडा तालुक्यांत हाहाकार माजवला आहे. कोळेगाव धरण ओव्हरफ्लो झाल्याने सीना नदी 2 लाख क्युसेक पाण्याने वाहत आहे, जी तिच्या 50 हजार क्युसेक क्षमतेच्या चौपट आहे.
यामुळे 20 ते 29 गावांचा संपर्क तुटला असून, वाकाव, केवड, उंदरगाव आणि तिऱ्हे येथे पूर शिरला आहे. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील लांबोटी पुलावर पाणी पोहोचले असून, मंगळवारी रात्री 11 पासून एका बाजूची वाहतूक बंद आहे. पूर्ण महामार्ग बंद होण्याची शक्यता आहे. NDRF आणि स्थानिक प्रशासनाने 200 हून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.


