Dattatray Bharne: राज्याचे नवे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे बुधवारी जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना शेतकऱ्यांच्या प्रचंड संतापाला सामोरे जावे लागले. गेवराई गावातील शेतकरी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत थेट मंत्र्यांना भिडले. त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर कठोर शब्दांत प्रश्न उपस्थित केले.
शेतकऱ्यांनी भरणे यांना शेतात उभे राहून पाण्यात भिजलेली व कुजलेली पिके दाखवली. इतकेच नव्हे तर काहींनी ही पिके हातात देऊन परिस्थितीची गंभीरता स्पष्ट केली. जिल्हाधिकाऱ्यांनी फळबागांचे पंचनामे करू नका, असा आदेश दिला आहे. तुमची यंत्रणा आम्हाला विचारायलासुद्धा येत नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे एक क्षण भरणे यांना तेथून तातडीने निघावं लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र नंतर त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत वातावरण शांत केले.
एका तरुण शेतकऱ्याने संताप व्यक्त करताना सांगितले, ’15 दिवस झाले, सगळीकडे पाणीच आहे. जनावरांना चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारकडून आम्हाला काहीही मिळालं नाही.’ शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्यानंतर कृषीमंत्री भरणे संतापले. त्यांनी पंचनाम्यात झालेल्या त्रुटींवर अधिकाऱ्यांना फटकारले. ‘ज्याचं नुकसान झालं त्याचा प्रत्येक गुंठा नोंदवला गेला पाहिजे. कुठेही पंचनामा राहिला तर जबाबदार अधिकारीच असतील. शेतकरी वंचित राहणार नाहीत, ही जबाबदारी माझी आहे,’ असा विश्वासही यावेळी कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिला.
अतिवृष्टीमुळं नुकसानग्रस्त झालेल्या भागाची पाहणी!
📍जालना | 📆 दि.२४ सप्टेंबर २०२५आज जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसनाग्रस्त झालेल्या भागाची पाहणी करत आहे. बदनापुर तालुक्यातील सोमठाणा गावात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. एकट्या जालना जिल्ह्यात… pic.twitter.com/gSTGCp7ngq
— Dattatray Bharane (@bharanemamaNCP) September 24, 2025
कृषीमंत्री भरणे यांनी सांगितलं की, ‘मी येथे आलो, कारण, तुमच्या संपूर्ण तालुक्यातील यंत्रणा कामाला लागेल. राज्यात प्रचंड नुकसान झाले आहे, पण कोणताही शेतकरी मदतीशिवाय राहणार नाही. घरांचे पडझड, गुरांचे बळी, विहिरींचे नुकसान सगळ्यांचा समावेश पंचनाम्यात केला जाईल. ऑगस्ट-सप्टेंबरमधील नुकसानीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे काळजी करू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे,’ असं आश्वासनही यावेळी कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे.


