Maharashtra Rain Alert : मॉन्सून महाराष्ट्रातून परतल्यानंतरही काही भागांत पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. भारत हवामान विभागाने (IMD) कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी विज-वाऱ्यासह पावसाचा अलर्ट जारी केला आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर हा पाऊस शेतकरी आणि प्रवाशांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
आज (१८ ऑक्टोबर) सिंधुदुर्ग, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, तर रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि धाराशिवमध्ये तुरळक ठिकाणी सरी कोसळण्याची शक्यता नोंदवली आहे. उर्वरित राज्यात कोरडे हवामान असून, उन्हाची तीव्रता वाढत आहे, ज्यामुळे तापमान ३४-३७ अंशांपर्यंत पोहोचले आहे.
या भागात विज व वाऱ्यासह पावसाचा इशारा
रविवारी (१९ ऑक्टोबर) रायगड, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे आणि कोल्हापूर-सातारा जिल्ह्यांत विज व वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. रत्नागिरी, नाशिक, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्ये ढगाळ हवामान असून काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. IMD च्या अंदाजानुसार, राज्यात संमिश्र हवामान राहील, तर विदर्भ आणि मराठवाड्यात कोरडे वातावरण कायम राहील.
ऑक्टोबर ‘हीट’चा कहर
राज्यात पावसाची उघडीप असली तरी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तापमान ३५ अंशांपेक्षा अधिक पोहोचले आहे. सांताक्रुज येथे ३७ अंश तापमान नोंदले गेले. अरबी समुद्रात लक्षद्वीप-केरळ-दक्षिण कर्नाटक किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने उकाडा वाढला आहे. ‘ऑक्टोबर हीट’मुळे दुपारच्या वेळी बाहेर पडणे तापदायक ठरत असून, नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला IMD ने दिला आहे.


