मुंबई : मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात गेले चार दिवस उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. “आम्हाला आझाद मैदानातून हुसकावून लावलं तर गरीब मराठ्यांच्या मनात बदला घेण्याची चीड निर्माण होईल. पोलिसांना सांगून अटक केली किंवा लाठीमार केला तर ते घातक ठरेल,” असे जरांगे यांनी ठणकावले. मराठा समाजाला ओबीसी कोट्याअंतर्गत १०% आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जरांगेंचा सरकारला थेट सवाल
जरांगे यांनी सरकारवर जोरदार टीका करताना म्हटले, “आम्ही मराठ्यांची औलाद आहोत, आम्ही भिणार नाही. सरकारने कितीही दडपशाही केली तरी आम्ही शांततेने लढत राहू. आम्ही कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही रविवारी रात्री सर्व गाड्या रस्त्यावरून हटवल्या, आता मुंबईत कुठेही वाहतूक कोंडी नाही. यापेक्षा जास्त काय कायद्याचं पालन करायचं?” त्यांनी पुढे सवाल केला की, जर सरकार गोरगरिबांना विसरत असेल, तर न्यायदेवता आम्हाला १००% न्याय देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“आमची संख्या साडेनऊ पट जास्त”
जरांगे यांनी सरकारला खणखणीत प्रत्युत्तर देताना म्हटले, “तुम्ही ज्याच्या जोरावर बोलता, त्यांच्यापेक्षा आमची संख्या साडेनऊ पट जास्त आहे. मराठा समाजाला कमी लेखू नका. मला आझाद मैदानातून हटवण्याच्या वल्गना बंद करा. मी मेलो तरी इथून हटणार नाही. सरकार कोणत्याही थराला गेलं तरी मी त्यापेक्षा पुढे जाईन. ३५० वर्षांनंतर मराठ्यांचं बळ पुन्हा दाखवायचं असेल तर मला नाईलाज आहे.” त्यांनी शनिवार-रविवारी आणखी मराठे मुंबईत दाखल झाल्यास सोमवारचं आंदोलन “खूप छान” होईल, असा इशाराही दिला.


