मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतून लढवायच्या की स्वबळावर, याचा निर्णय स्थानिक पातळीवर जिल्हाध्यक्ष घेतील, असे भाजपने स्पष्ट केले आहे. मात्र, यामुळे महायुतीतील मित्रपक्षांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कोकण विभागातील पदाधिकाऱ्यांच्या मुंबईतील बैठकीत दिले.
फडणवीस यांनी सांगितले की, स्वबळावर लढताना महायुतीचे भान ठेवावे आणि मित्रपक्षांना अडचण होणार नाही याची खबरदारी घ्यावी. नव्या लोकांचा पक्षात प्रवेश करून घेताना जुन्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत करावे आणि संघटना वाढवावी, असे आवाहनही त्यांनी केले. ठाणे आणि नवी मुंबईतील शिवसेना-भाजप वादाच्या पार्श्वभूमीवर टीका करताना संयम बाळगण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक निवडणुकांसाठी सज्ज झाले असून, काही कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्यास नाराजी दर्शवली असली, तरी नेते महायुतीतूनच निवडणुका लढवण्यावर भर देत आहेत. स्वबळाची चर्चा असली, तरी तिन्ही पक्षांचे नेते महायुतीच्या एकजुटीवर ठाम आहेत.


