आपल्या शरीरातील सर्वच अवयव महत्त्वाचे असतात. त्यांची कार्येही वेगवेगळी असतात. त्यात किडनी आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अनेक कार्ये करतात. ते रक्तातील टाकाऊ पदार्थ काढून टाकतात आणि शरीरातील अतिरिक्त द्रव आणि विषारी पदार्थ फिल्टर करतात. रक्तदाब नियंत्रित करण्यात पीएच पातळी संतुलित करण्यात आणि शरीरासाठी विविध हार्मोन्स तयार करण्यात किडनीची महत्त्वाची भूमिका असते.
किडनीच्या आरोग्याची खूप काळजी घेणे आवश्यक आहे. किडनी शरीरातील टाकाऊ आणि विषारी पदार्थ फिल्टर करतात. यासाठी, किडनीला पाण्याची आवश्यकता असते. कमी पाणी पिल्याने शरीरात वेस्ट जमा होऊ शकतो, ज्यामुळे किडनीवर दबाव वाढतो आणि किडनी स्टोनचा धोका वाढतो. पुरुषांनी त्यांच्या किडनी निरोगी ठेवण्यासाठी दररोज सुमारे ३.७ लिटर पाणी प्यावे आणि महिलांनी दररोज सुमारे २.५ ते ३ लिटर पाणी प्यावे. झोपेचा अभाव उच्च रक्तदाबाचा धोका वाढवतो. दीर्घकाळ झोप न मिळाल्याने मुले आणि प्रौढ दोघांमध्येही उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो. शारीरिक हालचालींचा अभाव थकवा वाढवतो, ज्यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब सारख्या समस्या उद्भवतात. या दोन्ही परिस्थितींमुळे मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते.
याशिवाय, अति मीठ सेवन शरीरासाठी आणि किडनीसाठी चांगले नाही. मीठ रक्तदाब वाढवते, ज्यामुळे हळूहळू किडनीचे नुकसान होऊ शकते. जास्त मीठ सेवनामुळे किडनीवर दबाव येतो आणि त्यांचे कार्य कमी होते. प्रौढांना दररोज 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ खाण्याचा सल्ला दिला जातो. यापेक्षा जास्त मीठ सेवन केल्याने उच्च रक्तदाब, स्ट्रोक आणि हृदयरोगाचा धोका वाढू शकतो. आपल्या शरीरातील बहुतेक मीठ पॅकेज्ड पदार्थांमधून येते, म्हणून बाहेरून अन्नपदार्थ खरेदी करताना कमी सोडियमयुक्त पदार्थांना प्राधान्य द्या.


