मुंबई : गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या उत्साहपूर्ण जल्लोषानंतर आज अनंत चतुर्दशीला मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जात आहे. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषांनी वातावरण भक्तिमय झाले आहे. मात्र, या उत्सवाच्या आनंदावर लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान घडलेल्या एका भीषण अपघाताने सावट पडले आहे.
लालबागच्या प्रवेशद्वाराजवळ दुर्दैवी घटना
लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या विरुद्ध मार्गावर शनिवारी (6 सप्टेंबर) पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने दोन चिमुकल्यांना चिरडले. या अपघातात 2 वर्षीय चंद्रा वजणदार हिचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा 11 वर्षीय भाऊ शैलू वजणदार गंभीर जखमी झाला. शैलूवर सध्या परळ येथील केईएम रुग्णालयात (KEM Hospital) उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रा आणि शैलू हे दोन्ही भाऊ-बहीण रस्त्याच्या कडेला झोपलेले होते. यावेळी एका अज्ञात चालकाने त्यांच्या अंगावर वाहन घातले आणि कोणतीही वैद्यकीय मदत न देता घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
काळाचौकी पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (2023) अंतर्गत कलम 106 (गैरहत्याकांड), 125(इ) (जीवाला धोका निर्माण करणे), 281 (निष्काळजीपणाने वाहन चालवणे), 184 (धोकादायक वाहन चालवणे) आणि 187 (अपघातानंतर पळून जाणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून आरोपी चालकाचा शोध सुरू आहे.
लालबागच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक
या दु:खद घटनेनंतरही लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सकाळपासून जल्लोषात सुरुवात झाली. लालबाग मार्केट आणि चिंचपोकळी स्टेशन (पश्चिम) परिसरातील उड्डाणपुलाखाली भाविकांच्या प्रचंड गर्दीत बाप्पाला पहिला निरोप देण्यात आला. दरवर्षीप्रमाणे भायखळ्यातील हिंदुस्तान मशिदीजवळ मशिदीच्या समिती सदस्यांनी मूर्तीचे स्वागत केले.
यानंतर मिरवणूक पुढे सरकत ऑपेरा हाऊस, सीपी टँक, आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणांवरून मार्गक्रमण करत रविवारी पहाटे गिरगाव चौपाटीवर पोहोचली. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”च्या जयघोषात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. ही मिरवणूक 18 ते 20 तासांहून अधिक काळ चालते आणि लाखो भाविक यात सहभागी होतात.


