Mumbai Fire : मुंबई परिसरातील मिरा-भाईंदर भागात भीषण आगीची घटना घडली असून, या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. भाईंदर पूर्वेतील इंद्रलोक परिसरात लोधा कॉम्प्लेक्सच्या मागील मोकळ्या जागेत उभारलेल्या झोपड्यांना शुक्रवारी रात्री सुमारे ८ वाजता आग लागली.
आग लागल्यानंतर काही क्षणांतच तीने विक्राळ रूप धारण केले. झोपड्यांमध्ये ठेवलेल्या गॅस सिलिंडरमुळे एकामागून एक स्फोट होत राहिल्याने आगीची तीव्रता आणखी वाढली. परिसरात धुराचे मोठे लोट पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि नवघर पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. काही तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.
प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीत अनेक झोपड्या आणि काही वाहने जळून खाक झाली असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
या दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.


