Maharashtra Weather : महाराष्ट्रात अवकाळी पावसानंतर आता उन्हाचा तडाखा वाढू लागला असून नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. मुंबई, पुणे आणि ठाणे परिसरात तापमान वाढल्याने दिवसेंदिवस उष्णता जाणवू लागली आहे.
हवामान विभागाने कोकण पट्ट्यात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देत येलो अलर्ट जारी केला आहे. कोकण भागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत उकाडा वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः मुंबईसाठी पुढील पाच दिवस महत्त्वाचे असून तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यातील तापमानात चढ-उतार दिसून येत आहेत. अकोला येथे ३८.७ अंश सेल्सिअस उच्चांकी तापमानाची नोंद झाली, तर निफाड येथे १५.५ अंश सेल्सिअस नीचांकी तापमान नोंदवले गेले.
सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता असून उर्वरित राज्यात मात्र उष्णतेचा जोर कायम राहणार आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना आता वाढत्या उकाड्यामुळे सर्वसामान्य नागरिकही हैराण झाले आहेत. त्यामुळे दुपारच्या उन्हात बाहेर पडताना काळजी घ्यावी, भरपूर पाणी प्यावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.


