Mumbai Crime: रिक्षात बसू दिले नाही, ह्याच रागातून वाद घालत एका अल्पवयीन मुलाने रिक्षा चालकाची चाकूने भोसकून निर्घृणपणे हत्या केली. कुर्ला पूर्वेतील साबळे नगर, न्यू रेल्वे कॉलनी रस्त्यावर सोमवार, १६ मार्च रोजी रात्री ही घटना घडली. जयराज जयपाल नायडू (४८) असे मृताचे नाव आहे. हत्येनंतर पळून गेलेल्या आरोपीच्या नेहरूनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून, हत्येचा गुन्हा नोंदवत त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.
जोशुवा जयराज नायडू (२१) यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांचे वडील जयराज नायडू यांनी अल्पवयीन मुलाला रिक्षामध्ये बसण्यास मज्जाव केला, याच रागातून त्या मुलाने जयराज यांच्या मानेवर डाव्या बाजूला वार केला. यात ते गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी जयराज यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
रिक्षा चालकाच्या मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास केला असल्याचे सांगितले आहे.


