मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आगामी निवडणुकीपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य करत राजकीय वातावरण तापवले आहे. “मुंबईचा महापौर मराठी आणि अस्सल भगव्या रक्ताचा, मराठी बाण्याचा असेल. दिल्लीचे जोडे उचलणारा कोणीही माणूस मुंबईचा महापौर होणार नाही,” असा निर्धार राऊत यांनी व्यक्त केला.
विशेष म्हणजे, ‘आमचा’ महापौर म्हणजे “ठाकरे बंधूंचा महापौर” असेल, असे स्पष्ट करत त्यांनी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यातील युतीला ‘दिल और दिमाग से बनी हुई’ युती असल्याचे सांगितले. राऊत यांच्या या वक्तव्यानंतर मुंबईच्या राजकीय समीकरणांवर चर्चा तीव्र झाली असून, महाविकास आघाडी (MVA) आणि ठाकरे बंधूंच्या युतीच्या भवितव्यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
मराठी बाणा’ आणि ठाकरे बंधूंचा महापौर
संजय राऊत यांनी मुंबईच्या महापौरपदावर ठाकरे बंधूंचा दावा ठोकताना भाजप आणि एकनाथ शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, “मुंबईचा महापौर तोच होईल, जो हुतात्मा चौकात जाऊन १०५ हुतात्म्यांपुढे साष्टांग दंडवत घालेल आणि महाराष्ट्राची गर्जना करेल. आमचा म्हणजे ठाकरे बंधूंचा महापौर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा!” राऊत यांनी स्पष्ट केले की, मराठी अस्मितेसाठी लढणारे फक्त दोनच पक्ष शिवसेना आणि मनसे आजच्या घडीला मराठी बाण्याचे प्रतिनिधित्व करतात. “ही युती फक्त राजकीय नाही, तर ‘तन, मन, धन आणि दिल और दिमाग’ यांनी बनलेली आहे,” असे त्यांनी ठासून सांगितले.
‘दिल और दिमाग’चा फॉर्म्युला
राऊत यांनी शिवसेना आणि मनसे यांच्यातील युतीला मराठी अस्मितेचा आधार दिला. “मराठी बाण्याचे भारतीय जनता पक्ष किंवा मिंधे (एकनाथ शिंदे) सांगतात तसे नाही. कोणी चिंता करू नये, मुंबईचा महापौर आमचाच होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही युती केवळ मुंबईपुरती मर्यादित नसून, राज्यातील प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठीही एकत्र काम करेल, असे राऊत यांनी सूचित केले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात प्रमुख महानगरपालिकांवर एकमत असल्याचे त्यांनी सांगितले.


