मुंबई : राज्यातील २३ नगरपरिषदा आणि नगरपंचायती तसेच विविध जिल्ह्यातील १४३ रिक्त सदस्यपदांसाठी आज (२० डिसेंबर २०२५) मतदान सुरू आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होत असून, उद्या (२१ डिसेंबर) सर्व निकाल एकत्र जाहीर होतील. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट स्पर्धा असली तरी काही ठिकाणी महायुतीतील पक्षांमध्ये ‘फ्रेंडली फाइट’ आहे. मतदानादरम्यान काही ठिकाणी गोंधळ आणि आरोप-प्रत्यारोपांच्या घटना समोर आल्या आहेत.
धर्माबादमध्ये धक्कादायक घटना
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद नगरपंचायतीच्या निवडणुकीदरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी मतदारांना इराणी मंगल कार्यालयात बोलावून कोंडून ठेवल्याचा गंभीर आरोप मतदारांनी केला आहे. पैशांचे आमिष दाखवून सकाळपासून मतदारांना तेथे थांबवले आणि भाजपला मत न देणाऱ्या मतदारांना मतदान करू नका अशी विनंती केल्याची चर्चा आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, कोणताही मोठा वाद दिसला नाही. मात्र, ही घटना निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभी करणारी आहे.
कोपरगावमध्ये उमेदवारांमध्ये बाचाबाची
अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील कोपरगाव येथे एस. जी. महाविद्यालयातील मतदान केंद्रावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये शाब्दिक चकमक झाली. मतदारांवर प्रभाव टाकण्याचा दोन्ही गटांकडून आरोप झाला. पोलिसांसमोरच ही बाचाबाची झाली, त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटांना केंद्राबाहेर नेले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
भुसावळमध्ये पोलीस व कर्मचाऱ्यांमध्ये वाद
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील प्रभाग क्रमांक ११ (ब) मधील अहिल्यादेवी कन्या विद्यालय मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचारी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. खाजगी वाहनाने साहित्य ने-आण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अडवल्याने हा वाद निर्माण झाला. वाहनावर परवानगी पत्र असूनही पोलिसांनी केंद्राबाहेर वाहन ठेवण्याची सूचना केली, ज्यामुळे काही काळ गोंधळ उडाला.
आज मतदान असलेली प्रमुख ठिकाणे
– अंबरनाथ
– कोपरगाव
– देवळाली-प्रवरा
– पाथर्डी
– नेवासा
– बारामती
– फुरसुंगी-उरुळी देवाची
– अनगर
– मंगळवेढा
– महाबळेश्वर
– फलटण
– फुलंब्री
– मुखेड
– धर्माबाद
– निलंगा
– रेणापूर
– वसमत
– अंजनगाव सूर्जी
– बाळापूर
– यवतमाळ
– वाशिम
– देऊळगावराजा
– देवळी
– घुग्घूस
या निवडणुकीत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान शांततेत पार पडावे यासाठी प्रशासन सतर्क आहे. निकाल उद्या जाहीर होणार असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.


