मुंबई : मुंबईत दहीहंडी उत्सवाचा जल्लोष जोरात सुरू असताना मानखुर्द येथे एका दुर्दैवी घटनेने उत्सवावर विरजण पडले आहे. 32 वर्षीय गोविंदा जगमोहन शिवकुमार चौधरी याचा दहीहंडीचा रोप बांधताना तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर येथे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
जखमी अवस्थेत त्याला गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अपघाताच्या घटनेनं दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले असून बाल गोविंदा पथकावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
याशिवाय, सकाळपासून मुंबईतील दहीहंडी उत्सवात 30 गोविंदा जखमी झाले आहेत. यापैकी 15 जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले, तर 15 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजकीय नेते आणि नृत्यांगणा गौतमी पाटील यांच्यासह सेलिब्रिटींच्या उपस्थितीत गोविंदा पथकांनी उंच मनोरे रचून विक्रम प्रस्थापित केले, पण या अपघातामुळे बाल गोविंदा पथकावर शोककळा पसरली आहे.


