Raj Thackeray and RSS Mohan Bhagwant : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषेच्या आधारावर होणारे वाद म्हणजे “स्थानिक आजार” असल्याचं विधान केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भाषिक अस्मितेचा मुद्दा तापला आहे. या वक्तव्यावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरून तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देत मोहन भागवतांना सुनावले आहे.
मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या आरएसएसच्या दोन दिवसीय व्याख्यानमालेत बोलताना मोहन भागवत यांनी मराठी विरुद्ध अमराठी वादाचा संदर्भ देत भाषेच्या आधारावर संघर्ष होणे हा स्थानिक आजार असल्याचं म्हटलं होतं. या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज ठाकरे यांनी सविस्तर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली.
राज ठाकरे म्हणाले की, “भाषेबद्दल आणि प्रांताबद्दलचं प्रेम जर आजार वाटत असेल, तर हा आजार देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये आहे. दक्षिण भारतापासून ते पंजाब, पश्चिम बंगाल आणि गुजरातपर्यंत भाषिक व प्रांतिक अस्मिता ठामपणे जपल्या जातात. महाराष्ट्रातच हे प्रेम आजार कसं ठरतं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच, एका राज्यातून मोठ्या संख्येने लोक दुसऱ्या राज्यात जाऊन स्थानिक भाषा, संस्कृती आणि अस्मितेचा अवमान करतात, तेव्हा स्थानिकांमध्ये रोष निर्माण होतो. या प्रतिक्रियेला आजार म्हणणं योग्य नाही, असं राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं. गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकांना हुसकावून लावण्यात आलं तेव्हा समरसतेचे धडे देण्यासाठी संघ पुढे का आला नाही, असा सवालही त्यांनी केला.
राज ठाकरे यांनी संघाच्या अप्रत्यक्ष राजकीय भूमिकेवरही टीका करत, “स्वतःला अराजकीय म्हणवून घेणाऱ्या संघाने अशा विषयांत पडायचंच कशाला?” असा प्रश्न उपस्थित केला. तसेच हिंदी लादण्याच्या मुद्द्यावर सरकारवर टीका करत, आधी त्या प्रश्नावर ठाम भूमिका घ्या आणि मग समरसतेच्या गोष्टी सांगा, असं आवाहनही त्यांनी केलं.
पोस्टच्या शेवटी राज ठाकरे यांनी ठामपणे म्हटलं की, “तुम्ही काय करावं हे तुमच्यापाशी. पण आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस हे अंतिम सर्वोच्च प्राधान्य आहे. या देशात भाषिक आणि प्रांतिक अस्मिता राहणारच आणि महाराष्ट्रातही त्या कायम राहणारच. हे आमचं स्वत्व आहे.”
राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा केंद्रस्थानी आला असून, त्यांच्या या प्रतिक्रियेची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.


