मुंबई : दीर्घ आजारपणानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अनेक दिवसांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला, तर मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीचं जोरदार स्वागत केलं.
काय म्हणाले संजय राऊत?
मी गेला एक महिन्याहून अधिक काळ घरात आणि रुग्णालयात ‘कैद’ आहे. माननीय उद्धव ठाकरे माझ्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत की मी बाहेर पडतोय का ते पाहतात. आजही त्यांची परवानगी नाही, अशी मिश्कील टिप्पणी राऊत यांनी केली. तब्येतीबाबत बोलताना ते म्हणाले, रेडिएशनचा कोर्स पूर्ण झाला. डॉक्टरांची टीम उत्तम काम करतेय. हळूहळू सुधारणा होतेय. उपचार आजारापेक्षा भयंकर असतात. डिसेंबरनंतर मी पूर्ण बरा होऊन मैदानात उतरेन, असं संजय राऊत यांनी म्हटले.
नगरपालिका निवडणुकीत पैशांचा पाऊस; शिंदे गटावर गंभीर आरोप
पुढे बोलताना म्हणाले की, शिंदे गटाच्या ‘गुलाबो गँग’ने १ तारखेला लक्ष्मी दर्शन होणार असं जाहीर केलंय. १०-१५ हजार रुपये प्रति मत असं लक्ष्मी दर्शन सुरू आहे. इतिहासात पहिल्यांदाच नगरपालिका-नगरपंचायत निवडणुकांत एवढा पैशांचा वापर होतोय. ५-६ हेलिकॉप्टर, खासगी विमानं वापरली जातायत. महाराष्ट्राची निवडणूक संस्कृती देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गेल्या ४-५ वर्षांत पूर्ण उद्ध्वस्त झाली आहे. सध्या सत्ताधारी तीन पक्षांमध्ये ‘मी मोठा की तू मोठा’ अशी स्पर्धा सुरू आहे, असं संजय राऊत म्हणाले.
शिंदे सेनेचा कोथळा अमित शाह काढणार
एकनाथ शिंदेंची शिवसेना असं मी म्हणायला तयार नाही. शिवाय शिंदे सेनेचा कोथळा अमित शाहच काढणार आहेत, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे यांच्यासोबत येण्याचं स्वागत
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीबाबत बोलताना राऊत म्हणाले, “राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना उत्तम प्रेझेंटेशन दाखवलं. दोघांचं जे काही चाललंय ते उत्तम चाललंय. मुंबईचा शत्रू भाजप आहे. अदानींच्या घशात मुंबई घातली जातेय. ती थांबवायची असेल तर राज ठाकरेंना बरोबर घेणं गरजेचं आहे. राज ठाकरे बरोबर आल्याने भाजपाचा मुंबईत पराभव निश्चित आहे.”


