Devendra Fadnavis, On Election Commission : महाराष्ट्रातील 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून, न्यायालयीन प्रक्रियेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून रंगात आलेला प्रचार अचानक थांबवावा लागल्यानं उमेदवार आणि पक्ष कार्यकर्त्यांचा उत्साह एकदम मावळला आहे. ज्या नगरपरिषदांच्या निवडणुका थांबवण्यात आल्या आहेत, त्यांचा नवीन कार्यक्रम जाहीर केला आहे. येथील मतदान 20 डिसेंबर रोजी, तर मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे. उर्वरित ठिकाणी मात्र निवडणुका नियोजित वेळापत्रकानुसार 2 डिसेंबरलाच पार पडतील.
दरम्यान, या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. ‘निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. माझ्या माहितीनुसार अशा पद्धतीने निवडणुका पुढे ढकलणे शक्य नाही. उद्या निवडणुका आणि आज अचानक स्थगिती, ही अत्यंत चुकीची भूमिका आहे,’ अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगावर केली आहे. तसेच, अनेक उमेदवारांच्या महिनाभराच्या प्रचाराची मेहनत वाया गेल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं. निवडणूक आयोग स्वायत्त असला तरी अशा निर्णयाविरुद्ध आम्ही रिप्रेझंटेशन सादर करू, असंही फडणवीस म्हणाले.
आज प्रचाराचा शेवटचा दिवस
नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा प्रचार आज संध्याकाळी 10 वाजता थांबणार आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी शेवटच्या दिवशी जोरदार सभा आयोजित केल्या आहेत. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर वरिष्ठ नेते आज राज्यभर प्रचारसभांमध्ये व्यस्त राहणार आहेत. मुख्यमंत्री संभाजीनगर, पुणे, नाशिक, अहिल्यानगर आणि बीडमध्ये जनसभांना उपस्थित राहणार आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आणि संभाजीनगरमध्ये सभा घेणार आहेत. तथापी, उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे जिल्हा आणि नाशिकच्या भगूर येथे प्रचार करणार आहेत.


