मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील राजगड सहकारी साखर कारखाना लि., अनंतनगर निगडे याला राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) कडून खेळत्या भांडवलासाठी 467 कोटी रुपयांच्या मार्जिन मनी कर्जाला राज्य सरकारची हमी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडाडून विरोध केला होता, परंतु मुख्यमंत्री फडणवीस यांनी मध्यस्थी करत हा प्रस्ताव मंजूर केला.
संग्राम थोपटे यांच्याशी संबंधित राजगड सहकारी साखर कारखान्याला कर्ज हमी देण्याच्या प्रस्तावावर अजित पवार यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. “बंद पडलेल्या कारखान्याला कर्जाची हमी का द्यावी?” असा थेट सवाल त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी, “यापूर्वीही अनेक साखर कारखान्यांना अशा प्रकारची हमी देण्यात आली आहे, मग राजगडला का नको?” अशी भूमिका मांडली. फडणवीस यांच्या समजुतीनंतर अखेर या प्रस्तावाला मंजुरी मिळाली, आणि कारखान्याला 467 कोटींच्या कर्जासाठी सरकारची हमी मिळाली.
पवार-थोपटे वाद पुन्हा चर्चेत
पवार कुटुंब आणि थोपटे कुटुंब यांच्यातील राजकीय वैर पुन्हा एकदा समोर आले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत संग्राम थोपटे यांनी काँग्रेसचे आमदार असताना महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचार केला होता, तर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भोरमधून शंकर मांडेकर यांना उमेदवारी देत थोपटेंचा पराभव केला. या पार्श्वभूमीवर थोपटे यांनी राजगड साखर कारखान्याच्या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी आणि सरकारी मदत मिळवण्यासाठी भाजपात प्रवेश केला होता.
संग्राम थोपटेंच्या कारखान्याला दिलासा
संग्राम थोपटे यांच्या राजगड सहकारी साखर कारखान्याची आर्थिक स्थिती गेल्या काही काळापासून बिकट होती. कारखान्याला पुन्हा उभारी देण्यासाठी आणि खेळते भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी NCDC कडून 467 कोटींचे कर्ज मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. थोपटे यांच्या भाजप प्रवेशानंतर हा निर्णय त्यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जात आहे.


