BMC Election 2026: संपूर्ण सरकारी यंत्रणा आणि प्रशासन सध्या केवळ सत्ताधाऱ्यांना पुन्हा खुर्चीवर बसवण्यासाठी राबत आहे. सत्तेचा असा नंगा नाच होणे हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण नाही. अशा गैरमार्गाने मिळवलेल्या यशाला ‘विजय’ म्हणता येणार नाही, अशा जळजळीत शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी महायुती सरकारवर तोफ डागली आहे. आज सकाळी दादर येथील बालमोहन शाळेत मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
निवडणूक आयोग आणि ‘पाडू’ यंत्राचा संशयास्पद कारभार
राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या नवीन यंत्रणेवर प्रश्न उपस्थित करताना सांगितले की, आयोगाने मतमोजणीसाठी ‘पाडू’ नावाचे नवे यंत्र आणले आहे, परंतु हे यंत्र कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेले नाही. हे यंत्र नेमके कसे काम करते, याची कोणतीही स्पष्टता नसल्याने त्यांनी संशय व्यक्त केला. तसेच व्हीव्हीपॅट (VVPAT) मशीनबाबत बोलताना ते म्हणाले की, मतदाराने दिलेले मत त्याच्याच पसंतीच्या उमेदवाराला गेले आहे की नाही, हे तपासण्याची कोणतीही खात्रीशीर व्यवस्था सध्या उपलब्ध नाही. वारंवार मागणी करूनही आयोगाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.
बोगस मतदान आणि शाईचा वाद
मतदान प्रक्रियेतील त्रुटींवर बोट ठेवताना राज ठाकरे यांनी बोटावर लावल्या जाणाऱ्या शाईवरही टीका केली. पूर्वी मतदानानंतर बोटावर पक्की शाई लावली जायची, मात्र आता केवळ मार्करने खूण केली जात आहे, जी सॅनिटायझरने सहज पुसली जाते. हे दुबार मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठीच केले जात आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी केला. दादरच्या छबिलदास केंद्रावर दुबार मतदार पकडल्याचा उल्लेख करत, त्यांनी मनसैनिक आणि शिवसैनिकांना आज दिवसभर मतदान केंद्रांवर कडा पहारा ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पैशांचा वापर आणि प्रशासकीय मोकळीक
प्रचाराची मुदत संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघरी जाऊन भेटी देण्याची परवानगी देणे, हा केवळ सत्ताधारी पक्षाला पैसे वाटता यावेत यासाठी केलेला खटाटोप आहे, असा खळबळजनक दावा राज ठाकरे यांनी केला. भाजपच्या विकासकामांच्या दाव्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की, एकीकडे विकासाच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे शाई पुसून बोगस मतदान करायचे, यालाच विकास म्हणायचे का? सरकारला आता राज्यात विरोधी पक्षच नको आहे, अशी त्यांची धारणा दिसत असून सत्तेचा हा गैरवापर लोकशाहीसाठी अत्यंत घातक असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.


