मुंबई : राज्यात ‘ऑक्टोबर हिट’चा ताप वाढलेला असताना आता बंगालच्या उपसागरातून उद्भवलेल्या चक्रीवादळ ‘मोंथा’ने (Cyclone Montha) नवं संकट आणलं आहे. हे चक्रीवादळ आता अतितीव्र स्वरूप धारण करून आंध्र प्रदेशाच्या काकीनाडा किनाऱ्यावर धडकण्याच्या उंबरठ्यावर आहे. यामुळे महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने (IMD) राज्यातील विदर्भ, कोकण, मुंबई आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, वादळी वाऱ्यासह हलका ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चक्रीवादळाचा प्रभाव २८ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत कायम राहील, आणि त्यानंतर अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रामुळे ३ ते ५ नोव्हेंबरपर्यंत गुजरात-राजस्थानमार्गे पाऊस सुरू राहील.
चक्रीवादळ ‘मोंथा’चा मार्ग
२७ ऑक्टोबर रोजी आंध्र किनारपट्टीपासून सुमारे १७० किलोमीटर अंतरावर असलेलं ‘मोंथा’ चक्रीवादळ काल (२८ ऑक्टोबर) सकाळी अतितीव्र चक्रीवादळात रूपांतरित झालं. भारत हवामान विभागाने (IMD) जारी केलेल्या प्रेस रिलीजनुसार, हे चक्रीवादळ आज (२९ ऑक्टोबर) मध्यरात्री काकीनाडा (आंध्र प्रदेश) किनाऱ्यावर ८०–८५ किलोमीटर प्रतितास वेगाने धडकणार आहे.
त्यानंतर ते ३० ऑक्टोबरला महाराष्ट्रातील नागपूर परिसरातून पुढे सरकून ३१ ऑक्टोबरला बिहार-पश्चिम बंगालमार्गे बांगलादेशात प्रवेश करेल. चक्रीवादळाचा वेध ४०-५० किलोमीटरपर्यंत आहे, आणि त्यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या विदर्भात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. कर्नाटकाच्या किनारी आणि उत्तर भागात, तसेच केरळमध्येही दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
‘मोंथा’ चक्रीवादळाचा थेट तडाखा महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागात जाणवेल, तर अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रामुळे पश्चिम किनारपट्टीवरही पावसाची सक्रियता वाढेल. IMD ने २७ ते ३० ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्र-गुजरात किनाऱ्याजवळ हा कमी दाबाचा पट्टा स्थिरावेल, असा अंदाज वर्तवला आहे. यामुळे राज्यात वादळी वाऱ्यांसह (४०-६० किमी/तास) हलका ते मुसळधार पाऊस पडेल.


