Nashik News : राज्यात थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात मोठी घट झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान १० अंशांच्या खाली घसरले असून हा गारठा आता जीवघेणा ठरत असल्याचे चित्र आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात अशीच एक हृदयद्रावक घटना घडली असून, कडाक्याच्या थंडीमुळे २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.
समीर दौलत सोनवणे (वय २२) असे मृत तरुणाचे नाव असून, तो देवगाव परिसरातील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाजवळ शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास मृतावस्थेत आढळून आला. ही बाब लक्षात येताच गावचे पोलीस पाटील सुनील बोचरे यांनी तातडीने लासलगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार, अतिथंडीमुळे हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन समीरचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण निफाड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, निफाड गहू कृषी संशोधन केंद्रात शुक्रवारी किमान तापमान ६.१ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. याआधी गुरुवारी यंदाच्या हंगामातील सर्वात कमी म्हणजेच ५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. या तीव्र गारठ्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेषतः रात्रीच्या वेळी उबदार कपडे वापरणे, उघड्यावर झोप टाळणे आणि आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.


