अहिल्यानगर : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली आहे. दिवाळीच्या खरेदीच्या निमित्ताने ‘फक्त हिंदूंकडूनच खरेदी करा’ असे आवाहन करून त्यांनी समाजात धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप आहे. यामुळे अकोला आणि सोलापूरसह राज्यभरात त्यांच्याविरोधात तक्रारी दाखल झाल्या असून, अटकेची तलवार टांगली आहे.
या वक्तव्याचा परिणाम पक्षांतही जाणवला असून, पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी जगताप यांना थेट बोलावून कान टोचले. विधानसभा निवडणुकीनंतर मुस्लिम समाजाला लक्ष्य करण्याच्या त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे पक्षाच्या पारंपरिक विचारसरणीला धक्का बसला आहे. पक्षाने जगताप यांना नोटीस बजावली असून, दोन समाजांत तेढ वाढवणारी वक्तव्ये टाळण्याचा इशारा दिला आहे. मात्र, वारंवार समज देत असूनही जगताप यांच्या वाचाळपणामुळे अजित पवारांची डोकेदुखी वाढली आहे.
सोलापूरमधील हिंदू आक्रोश मोर्च्यात विशिष्ट धर्मावर टीका करत भावना दुखावल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. यामुळे सार्वजनिक वातावरण दूषित झाल्याची तक्रार नोंदवली गेली. हिंदुत्वाचा नवा चेहरा घडवण्याच्या प्रयत्नात जगताप यांनी भाजप नेत्यांसोबत सहभागी होत ‘हिंदू धोक्यात आहे’ अशी धारणा पसरवली, ज्यामुळे राष्ट्रवादीची अडचण वाढली.
या प्रकरणाची चौकशी सुरू असून, पुढील कारवाईबाबत राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांचे डोळे लावले आहेत. पक्षांतूनही नाराजी व्यक्त होत आहे.


