Sayaji Shinde On Nashik Tree Cutting: नाशिकच्या तपोवन परिसरात सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधी आंदोलनाला आज मोठा पाठिंबा मिळाला आहे. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे स्वतः आंदोलनस्थळी दाखल होऊन पर्यावरणप्रेमींच्या लढ्याला साथ देण्यासाठी आले. साधूग्राम प्रकल्पासाठी एकही झाड तोडले जाऊ नये, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. “झाड म्हणजे आई-वडील, त्यांचा बळी देऊन कुठला साधूग्राम आणि कुठला कुंभमेळा?” अशा कडक शब्दांत त्यांनी राज्य सरकार आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला.
तपोवनातील आंदोलकांच्या पाठीशी सयाजी शिंदे
कुंभमेळ्यात साधूंच्या निवासासाठी तपोवन परिसरातील झाडे तोडण्याचा प्रस्ताव समोर आल्यानंतर पर्यावरणप्रेमींनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिकपासून राज्यभर हा मुद्दा चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवर सयाजी शिंदे तपोवनात आले आणि चालू आंदोलनाला प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांनी समर्थन जाहीर केले. गिरीश महाजन यांनी केलेल्या “वृक्षतोड अपरिहार्य” या विधानावर प्रतिक्रिया देताना सयाजी शिंदे म्हणाले, “महाजन साहेब, अशा प्रकारची विधाने करून लोकांची दिशाभूल करू नका. या जगात खरे सेलिब्रिटी असतील, तर ते म्हणजे झाडे! त्यांचे रक्षण करा, कोणताही छुपा अजेंडा राबवू नका. एकही झाड तोडले गेले तर हा विश्वासघात असेल.”
हेही वाचा – तपोवन उद्योगपतींच्या घशात घालू नका; साधूग्रामवरून राज ठाकरेांचा सरकारवर घणाघात
साधू येतील-जातील, पण झाडं गेली तर पिढ्यांचा भविष्य धोक्यात
सरकारने वारंवार केलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवणे कठीण झाल्याचे सांगत शिंदे पुढे म्हणाले, “साधू येतात आणि जातात, त्याने काही फरक पडत नाही. पण झाडे गेली, तर पुढच्या पिढ्यांचे नुकसान अटळ आहे. आपण संतांचा, शिवरायांचा वारसा सांगतो आणि निसर्गाचाच नाश करतो, हे कसे चालणार? झाडांची कत्तल म्हणजे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या विचारांचा अपमान आहे.”
सह्याद्री देवराईच्या वतीनेही त्यांनी नाशिककरांच्या संघर्षाला पाठिंबा जाहीर केला. “सरकार माघार घेत नसेल, तर आम्हालाही आंदोलन अधिक तीव्र करावे लागेल. तपोवनात एकही झाड कापू देणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. नाशिकमधील हा पर्यावरण लढा आता अधिक जोर धरत असून, नागरिकांसोबत अनेक मान्यवरही या विरोधात उभे राहताना दिसत आहेत.


