जामखेड: जामखेडच्या तहसीलदारांची गडचिरोली येथे बदली करण्यात आली असून या बदलीमुळे कर्जत-जामखेड मतदारसंघात मात्र राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठीची गटरचना करताना विशिष्ट गटात सोयीच्या विशिष्ट गावांचा समावेश करण्याचा सत्ताधाऱ्यांचा आदेश न जुमानल्याने तहसीलदारांची गडचिरोलीला बदली करण्यात आल्याचा आरोप आमदार रोहित यांनी केला आहे. दरम्यान, बदलीप्रकरणी पवार यांनी सभापती राम शिंदे यांचा बेट नामोल्लेख टाळून त्यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला आहे.
जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांच्या बदलीचा मंगळवारी आदेश निघाला असून त्यांची धानोरा (जि. गडचिरोली) येथे बदली करण्यात आली आहे. अवघ्या एका वर्षात या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली झाल्याने जामखेडच्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्हा परिषदेच्या गटरचनेचे काम सुरु आहे. जामखेड तालुक्यात साकत, खर्डा आणि जवळा असे तीन गट असून यातील काही गटातील गावे ही दुसऱ्या गटात समाविष्ट करण्याचा आदेश ‘वरून’ देण्यात आला होता. परंतु, सत्ताधारी असो की विरोधक त्यांच्या राजकीय आदेशापेक्षा नियमाला महत्त्व देणारे तहसीलदार गणेश माळी यांनी या आदेशाचे पालन केले नाही.
यावरून वजनदार सत्ताधारी नेत्याने संबंधित अधिकाऱ्याच्या अंगावर फाईलच भिरकावल्याची जोरदार चर्चा आहे. वॉर्ड रचना असो, गट रचना असो किंवा गण रचना ही सत्ताधाऱ्यांकडून नेहमीच आपल्या सोयीची केली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. त्यातूनच हा प्रकार घडल्याचे आणि संबंधित तहसीलदारांची बदली थेट गडचिरोलीला करण्यात आल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.
हाती सत्ता असल्याने काही नेत्यांना अहंकाराची बाधा झाली आहे. मग नियमात नसलेल्या कामासाठीही अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात असून नियमबाह्य आदेशाचं पालन न करणाऱ्या अधिकाऱ्याची दुर्गम भागात बदली केली जाते. अधिकाऱ्यांना प्रामाणिकपणाची शिक्षा मिळत असेल, तर त्यांच्याकडून चांगल्या कामाची कशी अपेक्षा करता येईल? त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी सत्तेच्या धुंदीतून बाहेर यावं. अन्यथा आगामी निवडणुकीत जनता त्यांची धुंदी उत्तरवल्याशिवाय राहणार नाही.
-रोहित पवार (आमदार, कर्जत-जामखेड)


