Sharad Pawar : जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार, अशा चर्चांना वेग आला असतानाच शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी या चर्चांना ठाम छेद दिला आहे. अजित पवार सत्तेत असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे शक्य नसल्याचे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
उत्तम जानकर म्हणाले की, “एकत्र येण्यापूर्वी अजित पवार यांनी सत्तेतून बाहेर पडायला हवे. अन्यथा हा प्रकार म्हणजे बिर्याणीत गुळवणी ओतल्यासारखा होईल.” अजित पवार यांच्या पक्षाकडे कोणताही ठोस विचार किंवा धोरण नसल्याची टीकाही त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले, शरद पवार यांची विचारधारा वेगळी असून ती पुरोगामी आहे, तर अजित पवार सध्या सत्तेच्या सोयीस्कर राजकारणात अडकले आहेत. “विचार आणि धोरणाशिवाय कोणताही पक्ष टिकू शकत नाही. भाजप आणि शिवसेनेकडे किमान हिंदुत्वाचा विचार आहे, पण अजित पवारांकडे सध्या तरी कोणतंही स्पष्ट व्हिजन दिसत नाही,” असा घणाघात जानकरांनी केला.
दरम्यान, या विधानामुळे सोलापूर जिल्ह्यातील शरद पवार गटातील आमदारांमध्येच मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही नेते एकत्र येण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत असताना, उत्तम जानकर यांनी मात्र उघडपणे विरोधी भूमिका मांडली आहे.
याचबरोबर, ईव्हीएमच्या मुद्द्यावरही त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. “ईव्हीएमची तपासणी झाली नाही, डिस्प्ले किंवा प्रोग्राम दाखवला नाही, तर सोलापूर जिल्ह्यात कुठेही निवडणुका होऊ देणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला. उत्तम जानकरांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


