PMC Election 2026: राज्यातील विविध महापालिकेत मतदानाच्यादिवशी (Voting) अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. कुठे पैशांचे वाटप केले जात आहे, कुठे बोगस मतदान केले जात आहे, कुठे बोटावरील शाई पुसून दुसऱ्यांदा मतदान केल्याचा प्रकार समोर येत आहे, तर आता चक्क येरवाड्यातील तुरुंगात असलेल्या आरोपीचेही मतदान झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पुण्यात (Pune) आरोपी येरवड्यात आणि इकडे प्रभाग 24 मध्ये त्याच्या नावावर मतदान झाल्याने राजकीय पक्षाचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. विशेष म्हणजे, निवडणूक (Election) अधिकाऱ्यांकडे याबाबत कुठलेही उत्तर नाही.
पुणे महानगरपालिका निवडणुकीदरम्यान मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे गंभीर प्रकार समोर येत आहेत. मतदान केंद्रावर पोहोचण्यापूर्वीच एका महिलेच्या नावावर आधीच मतदान झाल्याची बाब उघडकीस आली असून, त्यानंतर संबंधित महिलेने बेधडक सवाल केले. त्यानंतर तिच्याकडून पोस्टल मतदान करून घेतल्याचे सांगण्यात आले. पुण्यातील प्रभाग क्रमांक 21 मधील कटारिया हायस्कूल येथील मतदान केंद्रावर ही धक्कादायक घटना घडली आहे. शेख हसीना असे या महिलेचे नाव असून विशेष म्हणजे गेल्या 35 वर्षांपासून ती महिला याच मतदान केंद्रावर मतदान करते. दुसरीकडे प्रभाग 24 मध्ये तुरुंगातील व्यक्तीच्या नावावर बोगस मतदान झाल्याचं समोर आलं आहे.
बोगस मतदान
पुण्यातील प्रभाग क्रमांक 24 मधील सरस्वती मंदिर या मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याचं उघडकीस आलं आहे. बोगस मतदान झाल्याचा आरोप करत येथील मतदान केंद्रावर चांगलाच गोंधळ उडालाय. जो (व्यक्ती आरोपी) येरवडा जेलमध्ये आहे, त्याच्या नावावर सुद्धा मतदान करण्यात आलं आहे. याबाबत जे उमेदवार आहेत आणि कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून निवडणूक अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली. मात्र, आयोगाकडून कुठलंही उत्तर मिळत नाही. त्यामुळे, कार्यकर्ते संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान, प्रभाग 24 ड मध्ये भाजपचे पुण्यातील निवडणूक प्रमुख गणेश बीडकर हे उमेदवार आहेत. त्यांना राष्ट्रवादीच्या गणेश नवघरे, शिवसेनेच्या प्रवीण धंगेकर यांचे आव्हान आहे. त्यामुळे, येथील लढतीकडे पुणेकरांचे विशेष लक्ष लागले असून आज मतदानाच्या दिवशी येथील प्रभाग 24 मध्ये बोगस मतदान झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
पुण्यात चौरंगी लढत
पुणे शहरात 41 प्रभागातून 165 नगरसेवक निवडून येणार आहेत. पुण्यात होणार चौरंगी लढत होत असून महायुतीमध्ये असणारे तिन्ही पक्ष स्वंतत्र लढत आहेत. भाजपला दोन्ही राष्ट्रवादीचे आव्हान तर शिवसेना आणि काँग्रेस, उबाठा, मनसे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे, मुंबईनंतर यंदा पुण्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सगळाच गोंधळ, रोहित पवारांचा गंभीर आरोप
महापालिकेच्या मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याचं समोर येत आहे. आधी मतदान यंत्रणेत बिघाड, नंतर बोटाला लावली जाणारी शाई लगेच पुसली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मतदानाची टक्केवारी जाहीर करायला देखील विलंब केला जात आहे. अनेक केंद्रांमध्ये तर EVM क्रमवारीनुसार लावलेले नाहीत तर दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टारचं चिन्हही नाही. एकूणच काय तर मतदान प्रक्रियेमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्याचं काम खुद्द निवडणूक आयोगाकडूनच होतंय, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केलाय. अनेक ठिकाणी मतदानाची टक्केवारी दर दोन तासांनी जाहीर केली जात नाही. त्याऐवजी सायंकाळी एकत्रच ही टक्केवारी वाढवून बोगस मतदारांसाठी सोय करण्याचा तर हा प्रकार नाही ना? निवडणूक आयोगाने या सर्व बाबींची गंभीर दखल घेऊन ठराविक वेळेनंतर आकडेवारी जाहीर करावी अन्यथा आज मतदानाची शाई जशी पुसली जातेय तसं उद्या लोकशाही पुसली जाऊ नये, याची भीती वाटते, असेही आमदार पवार यांनी म्हटले.


