भोर: जसजशा निवडणुका येत आहेत. तसतशा नेत्यांच्या अचंबित करणाऱ्या वक्तव्यांनी वेगळीच रंगत येत आहे. महायुतीतील घटक पक्ष एकमेकांच्या समोर उभे राहतील अशी वेळ येऊ नये म्हणजे झाल आहे. ताज्या उदाहरणात पुण्यातील भोरमध्ये चंद्रकांत पाटील यांनी थेट अजित पवार यांना उद्देशून मोठ विधान केल आहे. भोरमध्ये नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रमुख लढत भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत होत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये सध्या भोर मध्ये जोरदार वाद रंगलेला पाहायला मिळत आहे. त्यातच चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना उद्देशून मोठ विधान केल आहे, ज्यामुळे सगळ्यांनाच आर्श्चयाचा धक्का बसला.
या सभेमध्ये भाजप मंत्री चंद्रकांत पाटील,‘भोर इथे अजित पवारांची सत्ता असली तरी राज्याच्या मंत्रिमंडळात ते उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीत भोरच्या जनतेने ठरवायचंय अजित पवार यांच्या बरोबर राहायचं? का राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जायचे?’ असं वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. भोर नगरपालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ वाघजाई मंदिरात चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
भोर तालुक्यातील रोजगाराच्या दृष्टीने औद्योगिक वसाहतीचा प्रश्न महत्वाचा असून भोरच्या औद्योगिक वसाहतसाठी करण्यासाठी प्रयत्न करू आणि येथील महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. बिहार विधानसभा निवडणुकीत NDA ला मिळालेल्या प्रचंड बहुमतामुळे नितीश कुमार हे पुन्हा मुख्यमंत्री झाले. तर, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीला मिळालेल्या जनादेशामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार स्थापन झाले.
देशातील सर्वसामान्य नागरिकांना मोदीजींच्या नेतृत्वावर आणि भाजपच्या कार्यपद्धतीवर प्रचंड विश्वास आहे असंही ते म्हणाले आहेत. देश क्रमांक एक बनावा, भारताचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी मोदीजी सतत प्रयत्नशील आहेत. नागरिकांसाठी अनेक लोकोपयोगी योजना राबवून त्यांनी सर्वसामान्यांच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडवला आहे. या सर्व योजनांचा लाभ स्थानिक पातळीवर प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी भोर नगर परिषदेतही भाजपाचे सरकार असणे अत्यावश्यक आहे, हे यावेळी त्यांनी सांगितलं.
तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान झाले तरी आम्ही माजलो नाही, दुसऱ्यांचा पक्ष संपवून टाका म्हणून ए आण रे त्याला उचलून असं काही केलेलं नाही. त्यांना वाटतय भविष्य बीजेपीच आहे, म्हणून ते येत आहेत. संग्राम थोपटे भाजपमध्ये आल्या आल्या त्यांच्या राजगड साखरं कारखान्याला मदत झाली. ती काँग्रेसमध्ये झाली नसती. असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये सुरू असलेल्या इनकमिंग वरही भाष्य केलं आहे.


