Pune News: पुण्यात घडलेल्या एका धक्कादायक वैद्यकीय प्रकरणात सीझेरियन प्रसूतीनंतर झालेल्या गंभीर दुर्लक्षामुळे एका महिलेला जीव गमवावा लागल्याचा निष्कर्ष राज्य ग्राहक आयोगाने काढला आहे. शस्त्रक्रियेदरम्यान महिलेच्या पोटात राहिलेल्या टॉवेलमुळे तिची प्रकृती इतकी बिघडली की तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तब्बल तीन वर्षे कोमात संघर्ष केल्यानंतर तिचा मृत्यू झाला. पत्नीला न्याय मिळवून देण्यासाठी तिचे पती प्रशांत कुकडे यांनी चौदा वर्षे लढा दिला आणि शेवटी आयोगाने रुग्णालय व संबंधित डॉक्टरांना दोषी ठरवत २६ लाख ५० हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले.
काय आहे नेमकं प्रकरण?
पाषाण येथील प्रशांत कुकडे यांनी सूस रोडवरील जीवनदीप मेडिकेअर सेंटर आणि डॉक्टर दीपलक्ष्मी रगडे यांच्या विरोधात २००८ मध्ये तक्रार दाखल केली होती. ८ ऑगस्ट २००८ रोजी त्यांच्या पत्नी रूपाली कुकडे यांची दुसऱ्या बाळासाठी सीझेरियन प्रसूती करण्यात आली. मात्र, टाके घालताना ऑपरेशन थिएटरमध्ये वापरलेला टॉवेलच महिलेच्या पोटात राहिल्याचे डॉक्टरांना लक्षात आल्यानंतर पुन्हा टाके उघडावे लागले. या धक्क्यानंतर रूपाली यांना तात्काळ हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे काही दिवस उपचार सुरू असतानाच त्यांच्या मेंदूला गंभीर सूज (एन्सेफॅलोपॅथी) आल्याचे निदान झाले. त्यांना पुढे आणखी एका विशेष रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले. मात्र त्या कोमाच्या अवस्थेत गेल्या आणि अखेर १ मे २०११ रोजी त्यांचे निधन झाले.
हेही वाचा – कचऱ्यात 10 लाखांची बॅग…पण लालच नाही! पुण्यातील कचरा वेचणाऱ्या महिलेने मालकाला शोधून परत केले पैसे
१७ वर्षांनी मिळालेला महत्त्वाचा निकाल
ही तक्रार दाखल झाल्यानंतर दीर्घ सुनावण्यांनंतर राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या पुणे खंडपीठाकडून अखेर निर्णय देण्यात आला. अध्यक्षीय सदस्य मिलिंद सोनवणे आणि सदस्य नागेश कुंबरे यांनी दिलेल्या आदेशात रुग्णालय व डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणावर कठोर शब्दांत ताशेरे ओढले. आयोगाने नमूद केले की, प्रसूतीनंतर रुग्ण अत्यवस्थ असतानाही तिला तातडीच्या सुविधा असलेल्या रुग्णालयात त्वरित हलवण्यात आले नाही. रुग्णालयाने डिस्चार्ज पेपर आणि महत्त्वाची कागदपत्रे दीड महिन्याने दिली. तज्ज्ञ समितीने निष्कर्ष काढला की, रूपाली यांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक पावले उचलली गेली नाहीत. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी अपेक्षित सतर्कता न दाखवल्यामुळे परिस्थिती बिकट झाली. या सर्व बाबी ‘गंभीर वैद्यकीय निष्काळजीपणा’ म्हणून ग्राह्य धरत आयोगाने नुकसानभरपाई जाहीर केली.
तक्रारदारांच्या वकिलांची प्रतिक्रिया
अॅड. ज्ञानराज संत यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करताना म्हटले, “विलंब झाला, पण न्याय मिळाला. हा निकाल वैद्यकीय क्षेत्रातील पारदर्शकता वाढवेल आणि यामुळे आता डॉक्टरांच्या कामकाजावर आवश्यक शिस्त राहील.” हा निकाल भविष्यात अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मार्गदर्शक ठरणारा असून, वैद्यकीय सेवेत जबाबदारी आणि उत्तरदायित्व वाढवणारा ठरला आहे.


