Pune Crime: पुणे शहरात एक खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. दोन जिवलग मित्रांमध्ये जुन्या मैत्रिणीला कॉल करण्यावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, एका मित्राने दुसऱ्या मित्रावर कोयत्यानेच अनेक वार केले. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
आदित्य कांबळे आणि चेतन चव्हाण असे दोन्ही मित्रांची नावे आहेत. चेतन चव्हाण याने आदित्य कांबळेवर कोयत्याने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या आदित्यला ३० टाके पडले आहेत.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरामध्ये २ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता ही घटना घडली आहे. आदित्य कांबळे आणि चेतन चव्हाण हे दोघे चांगले मित्र आहेत. दोघेही २ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी भारती विद्यापीठ परिसरात असलेल्या एका रसवंती गाडीजवळ उभे होते. गप्पा मारत असतानाच त्यांच्यात जुन्या मैत्रिणीचा विषय निघाला.
आठवण निघाली म्हणून त्या मैत्रिणीला कॉल करायचं ठरलं आणि तिथेच वादाची ठिणगी पडली. त्या मैत्रिणीला कॉल कोण करणार यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेला आणि चेतन चव्हाण थेट तिथला कोयताच घेतला.
भररस्त्यात आदित्यवर कोयत्याने वार
चेतन चव्हाणने कोयता घेतल्यानंतर आदित्य कांबळे पळाला. त्याचा चेतनने पाठलाग केला आणि गाठले. त्यानंतर चेतनने आदित्यवर सपासप वार करण्यास सुरूवात केली. आदित्यने हाताने त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यात तो रस्त्यावर पडला. चेतन मात्र वार करतच होता.
चेतनने केलेल्या हल्ल्यात आदित्य गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला ३० टाके पडले असून, डोक्यालाही गंभीर इजा झाली आहे. त्याच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्यच्या नातेवाईकांनी पोलिसांवर आरोप केला आहे की, हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल न करता धारदार शस्त्राने गंभीर दुखापत केल्याच्या कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.


