पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खडकवासला धरणासह इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
परिणामी मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि आवश्यक खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास शहरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
नेमकं काय म्हणाले जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी?
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, सध्या पुणे जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती नियंत्रणात आहे, परंतु पाऊस असाच सुरू राहिल्यास शहरातील काही भागांत पूरस्थिती उद्भवू शकते. सर्व यंत्रणा सतर्क असून, आम्ही सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.
खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे. पूर नियंत्रण रेषेजवळ राहणाऱ्या नागरिकांना गरज भासल्यास सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना देण्यात येतील. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे डुडी यांनी स्पष्ट केले.
खडकवासला धरणातून वाढता विसर्ग
पुणे महानगरपालिकेने (PMC) दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला धरणाच्या सांडव्यातून मुठा नदी पात्रात मंगळवारी (19 ऑगस्ट) सकाळी 7,561 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. दुपारी 12 वाजता हा विसर्ग वाढवून 9,659 क्युसेक करण्यात आला आहे.
पावसाच्या आणि धरणातील पाण्याच्या आवकेच्या परिस्थितीनुसार यात बदल होऊ शकतात. पुणे महानगरपालिकेने नागरिकांना मुठा नदीकाठच्या कमी उंचीच्या भागात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः शिवणे पूल आणि नदीकाठच्या रस्त्यांचा वापर टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


