पुणे: “दारू पिणे आरोग्यास हानिकारक आहे” असा इशारा मद्याच्या प्रत्येक बाटलीवर छापलेला असतो. मात्र, या इशाऱ्यांचा केंद्रबिंदू मुख्यतः शारीरिक आरोग्यावर असतो. मद्यपानामुळे होणारे मानसिक परिणामही तितकेच गंभीर असून, त्याबाबत जनजागृती करणेही तितकेच आवश्यक आहे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विल्यम साळवी यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
साळवी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या मद्यांच्या बाटल्यांवर ‘अत्यधिक मद्यपानामुळे नैराश्य, चिंता, स्मृतीभ्रंश होऊ शकतो’, ‘मद्यपानामुळे मानसिक संतुलन बिघडू शकते’ अशा स्वरूपाचे स्पष्ट व ठळक इशारे छापणे बंधनकारक करावे.”
या मागणीला समाजसेवक व व्यसनमुक्ती कार्यकर्ते डॉ. सोमनाथ गिते यांच्यासह व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक सामाजिक संस्थांनीही पाठिंबा दर्शवला आहे. ‘सध्या मद्याच्या बाटल्यांवरील इशारे केवळ शारीरिक आरोग्यापुरते मर्यादित आहेत. मानसिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम नागरिकांना ज्ञातच नाहीत. त्यामुळे अनेक तरुण व नागरिक अज्ञानातून मानसिक आजारांनी ग्रासले जात आहेत,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
तंबाखू व सिगारेटसारख्या उत्पादनांवर ‘कर्करोगाचा धोका’, ‘प्राणघातक आहे’ अशा चेतावणी असतात. त्याच धर्तीवर मद्याच्या बाटल्यांवरही स्पष्ट मानसिक चेतावणी असाव्यात, असे साळवी यांनी नमूद केले आहे.
या मागणीला आधार देणारे जागतिक आरोग्य संघटना (WHO) व राष्ट्रीय मानसिक आरोग्य संस्था (NIMHANS) यांचे अभ्यासही महत्त्वाचे ठरतात. विशेषतः NIMHANS च्या २०२३ च्या अहवालानुसार, भारतात मद्यपानाशी संबंधित मानसिक विकारांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, नैराश्य, चिंता विकार, झोपेच्या समस्या, स्मृतीभ्रंश, आत्महत्येची प्रवृत्ती यासारख्या गंभीर परिणामांची नोंद झाली आहे.
सध्या लागू असलेल्या कायद्यांनुसार, राज्य उत्पादन शुल्क अधिनियमांतर्गत मद्याच्या पॅकेजिंगवर आरोग्यविषयक इशारे बंधनकारक असले तरी त्यामध्ये मानसिक आरोग्याचा उल्लेख नसल्याने ते अपुरे ठरतात, असे साळवी यांचे म्हणणे आहे.
कॅनडा, ऑस्ट्रेलिया, फ्रान्ससारख्या देशांमध्ये अल्कोहोलच्या बाटल्यांवर मानसिक चेतावणी देण्याची सक्ती आहे. त्यामुळे ग्राहकांना केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक धोकेही माहीत होतात आणि निर्णय घेताना ते अधिक जबाबदारीने विचार करतात.
“दारूपासून केवळ यकृत, किडनी यांवरच नाही, तर मन, विचार आणि वर्तनावरही खोल परिणाम होतो. त्यामुळे मद्यपान ही केवळ व्यसनाची नव्हे, तर मानसिक आरोग्याचीही समस्या आहे,” असे मत तज्ज्ञांनीही व्यक्त केले आहे.
या पार्श्वभूमीवर साळवी यांनी राज्य सरकार, उत्पादन शुल्क विभाग आणि आरोग्य विभाग यांना आवाहन केले आहे की, दारूपासून होणाऱ्या मानसिक परिणामांची जनजागृती व्हावी यासाठी बाटल्यांवर स्पष्ट चेतावणी देणे अनिवार्य करावे. कारण व्यसनमुक्तीची सुरुवात ही माहिती आणि जागृतीपासूनच होते, असे त्यांनी नमूद केले आहे.


