राजगुरुनगर (पुणे) : राजगुरुनगर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचार सांगता सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्याबद्दल मन मोकळं केलं आहे. “शरद पवार साहेबांनी मला राजकारणात संधी दिली, मला काम करण्याची संधी दिली. त्यांचं हे ऋण मी आयुष्यभर विसरू शकत नाही,” असं सांगताना अजित पवार भावुक झाले.
पण त्यांनी पुढचं कारणही स्पष्ट केलं, “नंतरच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कामाची पद्धत, त्यांनी देशाला जागतिक पातळीवर दिलेलं स्थान, विविध कल्याणकारी योजना पाहून मला भुरळ पडली. विकासासाठी सत्तेत राहून निर्णय घेता येतात. सत्तेबाहेर राहिल्याने पाच-पाच वर्षं वाया जातात, हा अनुभव माझ्याकडे आहे,” असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.
राजगुरुनगरसह पुणे जिल्ह्यातील अनेक नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांत महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू असून अजित पवार स्वतः अनेक सभा घेत आहेत. या सभेत त्यांनी शरद पवारांबद्दल कृतज्ञता तर व्यक्त केलीच, पण महायुतीत राहण्याचं राजकीय कारणही पुन्हा एकदा स्पष्ट केलं.
अजित पवारांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर दगडफेक
जत नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा आज (१ डिसेंबर) शेवटचा दिवस असताना प्रचाराला हिंसक वळण लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेश शिंदे यांच्या घरावर आणि त्यांच्या गाडीवर सोमवारी पहाटे अज्ञात व्यक्तींनी जोरदार दगडफेक केली. या घटनेत गाडीच्या काचा फुटल्या, घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सुदैवाने कुणाला दुखापत झाली नाही.


