सोलापूर : माढा मतदारसंघातील शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला येथील कार्यालयावर सोमवारी निवडणूक आयोगाच्या पथकाने छापा टाकला. त्यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणीही धाडी पडल्या. या कारवाईनंतर शहाजीबापू पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट राजकारण सोडण्याचा मनातील विचार उघड केला आहे.
ते म्हणाले, “हे सगळं चुकीच्या दिशेने राजकारण सुरू आहे. आज मनात राजकारण सोडून देण्याचा विचार येतोय. मी वरिष्ठ नेत्यांशी बोलून थांबण्याचा निर्णय घेईन. मी अनेक निवडणुका लढलो, पण सांगोल्याच्या राजकारणात अशी पद्धत कधीच नव्हती. सांगोल्याच्या स्वाभिमानी जनतेने हे सगळं पाहावं.” असं शहाजीबापू पाटील म्हणाले.
भाजप नेत्यांवर थेट आरोप
शहाजीबापू पाटील यांनी ही धाड सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी पालकमंत्री तथा भाजप नेते जयकुमार गोरे यांच्यासोबत मिळून घडवल्याचा गंभीर आरोप केला.
भाजपकडून स्टंटबाजीचा आरोप
दरम्यान, भाजप नेते तथा आमदार बाबासाहेब देशमुख यांनी शहाजीबापूंच्या विधानाला “पराभवाची भीती असल्याने केलेली स्टंटबाजी” असं म्हटलं आहे. ते म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाल्यानंतर शहाजीबापूंना पराभव दिसू लागलाय. म्हणूनच ते पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करत आहेत. ही फक्त सहानुभूती मिळवण्याची स्टंटबाजी आहे.”
सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांच्या तोंडावर महायुतीतच निर्माण झालेल्या या अंतर्वादाने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शहाजीबापू पाटील हे शिंदे गटाचे तगडे नेते मानले जातात. त्यामुळे त्यांच्या “राजकारण सोडण्याच्या” घोषणेमुळे शिंदे गट आणि भाजप यांच्यातील दरी अधिकच रुंद होण्याची चिन्हे दिसत आहेत.


