Indapur: इंदापूर तालुक्यातील कळंब गावात बुधवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. कळंब-निमसाखर रस्त्याच्या कडेला एक मानवी पाय आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी लगेचच पोलिसांना माहिती दिली, आणि काही तासांतच वालचंदनगर पोलीस, गुन्हे शाखा, तसेच फॉरेन्सिक तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले. गुडघ्याखालचा हा पाय मध्यमवयीन पुरुषाचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी सांगितले की, सकाळी सुमारे ७:३० वाजता एका स्थानिक रहिवाशाला हा पाय रस्त्याच्या कडेला दिसला. तपासादरम्यान, त्या पायाला मोजे घातलेले असल्याचे आणि जवळच एक गोणी आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही वस्तूंचा एकमेकांशी काही संबंध आहे का, याची चौकशी सुरू आहे.
फॉरेन्सिक पथक जखमेचे स्वरूप आणि पायावरचे चिन्ह तपासून ही अपघाती घटना आहे की काही गुन्हेगारी कारवाईचा भाग, हे निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहे. परिसरातील उसाच्या शेतांमुळे तपासात काही अडचणी येत असल्या तरी, पोलिसांनी स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने आजूबाजूचा भाग चाळून पाहण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा – इंदापूरमधील राजकारण तापलं! उमेदवार निवडीवरून अजित पवारांच्या पक्षात बंडाचा झेंडा
दरम्यान, या भागाजवळ जिल्ह्याची सीमा असल्याने, हा अवयव कोणीतरी चालत्या वाहनातून फेकला असावा अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी शेजारच्या जिल्ह्यांतील पोलीस ठाण्यांशी संपर्क साधला आहे तसेच अलीकडील बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची तपासणी सुरू केली आहे. घटनास्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही गोळा केले जात आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवा न पसरवण्याचे आवाहन केले असून, तपास पूर्ण होईपर्यंत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.


