Maharashtra Winter Temperature Update : पाकिस्तानसह शेजारील देशांकडून भारतात शिरकाव करणाऱ्या थंड वाऱ्यांच्या लहरींमुळे महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला आहे. मुंबई, पुणे, कोकणासह राज्यातील अनेक भागांत तापमानात लक्षणीय घट झाली असून पुढील २४ तास ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र, त्यानंतर हळूहळू तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागानुसार, ईशान्य मोसमी वाऱ्यांचा हंगाम संपला असून सध्या उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव जाणवत आहे. सोमवारी निफाड येथे किमान ७.९ अंश सेल्सिअस, गोंदिया येथे ९.८ अंश, तर धुळे येथे १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
आज राज्यात काही भागांत थंडीचा जोर किंचित कमी होऊ शकतो. किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता असून, काही ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान आणि उकाडा जाणवू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तापमानात हळूहळू वाढ होत असल्याने गारठ्याची तीव्रता कमी-अधिक होत आहे.
यवतमाळमध्ये थंडीचा आरोग्यावर परिणाम
यवतमाळ जिल्ह्यात अचानक बदललेल्या हवामानामुळे सर्दी, खोकला, डोकेदुखी आणि अपचनाचे रुग्ण वाढले आहेत. सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या वाढल्याने गर्दी पाहायला मिळत आहे. दुपारी कडक ऊन, तर सकाळ-संध्याकाळ गारठा अशी परिस्थिती असल्याने नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.


