Govind Pansare Murder Case : पुरोगामी विचारवंत आणि नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सांगलीतील राहत्या घरी समीर गायकवाड याचा मृत्यू झाला असून, प्राथमिक अंदाजानुसार हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
१६ फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापूरमध्ये गोविंद पानसरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. उपचारादरम्यान २० फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांचे निधन झाले. या हत्याकांडामुळे राज्यभरात तीव्र संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणात समीर गायकवाड हा प्रमुख संशयित आरोपी होता.
१६ सप्टेंबर २०१५ रोजी विशेष तपास पथकाने (SIT) समीर गायकवाड याला अटक केली होती. त्याच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. नंतर कोल्हापूर सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केल्यानंतर तो जामिनावर बाहेर होता.
तपासादरम्यान समीर गायकवाडच्या मोबाईल फोनमधील डेटा आणि आवाजाच्या नमुन्यांची पडताळणी करण्यात आली होती, अशी माहिती तपास यंत्रणांनी न्यायालयाला दिली होती. दरम्यान, जानेवारी २०२४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जामिनाच्या अटींचे उल्लंघन झाले नसल्याचे नमूद करत, राज्य सरकारची जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली होती.
या हत्या प्रकरणात एकूण १२ आरोपींची नावे समोर आली असून, त्यापैकी १० जणांना अटक, तर २ आरोपी अद्याप फरार आहेत. या हत्येचा संबंध नरेंद्र दाभोलकर आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्यांशी जोडला जातो. समीर गायकवाडच्या मृत्यूमुळे या संवेदनशील प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


