Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील वाढत्या अत्याचारांच्या घटनांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यात सुरू असलेल्या घटनांसाठी थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना जबाबदार धरत त्यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत सरकारवर निशाणा साधला.
अकलूज येथे माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले, “जोपर्यंत देवेंद्र फडणवीस सत्तेत आहेत, तोपर्यंत राज्यात खून आणि अत्याचाराच्या घटना थांबणार नाहीत. त्यांचं काम राक्षसी वृत्तीने सुरू आहे. त्यामुळे हे सरकार उलथवून लावण्याची वेळ आली आहे.”
बुधवारी रात्री ते अकलूज येथील धनाजी साखळकर यांच्या निवासस्थानी आले होते. यावेळी त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून सरकारवर जोरदार टीका केली.
याचवेळी त्यांनी बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरूनही गंभीर आरोप केले. या प्रकरणातील आरोपींना तुरुंगात एसी आणि मोबाईलसारख्या सुविधा पुरवल्या जात असल्याचा दावा करत, “हे आरोपी नेमक्या कोणाच्या आशीर्वादाने इतक्या चैनीत आहेत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, भाजपच्या तीन राज्यांतील विजयावरही जरांगे पाटील यांनी संशय व्यक्त केला. ते म्हणाले, “या निकालांमध्ये काहीतरी गडबड असल्याची चर्चा आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव शक्य नाही, असं स्थानिक लोक सांगत आहेत. मग भाजपला एवढं मतदान कसं झालं? यात नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे.” जरांगे पाटील यांच्या या आक्रमक वक्तव्यांमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.


