Raj Thackeray : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या अमानुष घटनेवर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया देत तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी सरकारवरही कठोर शब्दांत निशाणा साधला.
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “या नराधम आरोपीला कायदा काय सांगतो किंवा कोण काय म्हणेल याचा विचार न करता सरकारने हालहाल करून संपवावं.” या घटनेने मन सुन्न झाल्याचे सांगत त्यांनी अशा प्रकारांवर तातडीने कठोर कारवाईची मागणी केली.
ते म्हणाले की, नसरापूरमधील या घटनेने महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. सरकार अशा घटनांनंतर फास्टट्रॅक कारवाईचे आश्वासन देते, मात्र ‘फास्टट्रॅक’ची नेमकी व्याख्या काय आहे, हेही स्पष्ट करायला हवं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज ठाकरे यांनी राज्यात मुली आणि महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करत, “हे प्रकार एका वर्षापुरते मर्यादित नाहीत, तर वर्षागणिक वाढत आहेत. याचा अर्थ कायद्याचा धाक पूर्णपणे संपला आहे,” असे स्पष्टपणे म्हटले.
नसरापूर परिसरात या घटनेविरोधात आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर झालेल्या कथित लाठीचार्जवरही त्यांनी संताप व्यक्त केला. “आंदोलकांवर तत्परतेने कारवाई करणारे सरकार, अत्याचार करणाऱ्यांवर तितकीच तत्परता का दाखवत नाही?” असा सवाल त्यांनी केला.
राज ठाकरे यांनी या घटनेच्या निमित्ताने समाजातील बदलत्या प्रवृत्तीवरही भाष्य केले. “जे वरती घडतं, त्याचं प्रतिबिंब खाली उमटतं. सत्तेची लालसा, नैतिक मूल्यांचा ऱ्हास आणि कायद्याचा उरलेला नसलेला धाक यामुळे समाजात भीतीचं वातावरण नाहीसं झालं आहे,” असं त्यांनी नमूद केलं.
तसेच, समाजात पूर्वी असणारी प्रतिष्ठा गमावण्याची भीती आता उरलेली नसल्याने अशा घटना वाढत असल्याचं त्यांनी म्हटलं. महाराष्ट्राचं विचलित झालेलं ‘लक्ष’ आणि भरकटलेलं ‘लक्ष्य’ पुन्हा योग्य दिशेला आणण्यासाठी सरकारने तातडीने मूलभूत उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. राज ठाकरे यांच्या या संतप्त प्रतिक्रियेमुळे नसरापूर प्रकरणावरील चर्चेला आणखी उधाण आलं आहे.


