जुन्नर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी (जालना) येथून मुंबईच्या दिशेने निघालेल्या मराठा आंदोलनाला मोठा धक्का बसला आहे. आज (28 ऑगस्ट) सकाळी जुन्नरजवळ मराठा आंदोलक सतीश देशमुख यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील प्रस्तावित उपोषणापूर्वी ही दुर्दैवी घटना घडल्याने मराठा समाजात आणि आंदोलकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
सतीश देशमुख यांचा मृत्यू
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने मोर्चा निघाला. आज सकाळी हा मोर्चा शिवनेरी येथे पोहोचला. मात्र, याचवेळी जुन्नरजवळ सतीश देशमुख या आंदोलकाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. ही घटना घडल्याने आंदोलनातील कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. सतीश देशमुख यांच्या मृत्यूमुळे मराठा आरक्षणाच्या लढ्याला मोठा धक्का बसल्याची भावना व्यक्त होत आहे.
मनोज जरांगेंना आझाद मैदानावर 8 तासांची परवानगी
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्याची घोषणा केली आहे. मुंबई पोलिसांनी त्यांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी केवळ 8 तासांची परवानगी दिली आहे, जी जरांगे यांनी प्राथमिक स्वरूपात मान्य केली आहे. मात्र, शिवनेरी येथील पत्रकार परिषदेत त्यांनी वेगळी भूमिका मांडण्याचे संकेत दिले. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना, “ही लोकशाही राहिलेली नाही. गणेशोत्सवाच्या नावाखाली डाव साधला जात आहे,” असा आरोप केला. तसेच, आंदोलनावरील अटी-शर्ती हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात कायमस्वरूपी आरक्षण मिळाल्याशिवाय ते माघार घेणार नाहीत. त्यांनी सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला असून, जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुंबईत बेमुदत उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे. आंदोलनाच्या मार्गाबाबत त्यांनी सांगितले की, मोर्चा 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून निघाला असून, पैठण, शेवगाव, कल्याण फाटा, आळे फाटा, जुन्नर, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर मार्गे आझाद मैदानावर पोहोचणार आहे.


