Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याच्या जवळ बुधवारी सकाळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनरने पाच वाहनांना धडक दिली. या अपघातात तीनजण ठार, तर पाचजण जखमी झाले. मृतांमध्ये पुण्यातील तिघांचा समावेश आहे. अपघातात अंबादास दामू पेटारे (रा. सिंहगड रोड, पुणे), श्रीकांत अनंत जाधव (वय ६३, रा. पुणे), प्रमोद संतोष पवार (रा. पुणे) यांचा मृत्यू झाला आहे.
द्रुतगती महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास काळाने घाला घातला. चालक अवधेश यादव हा पुण्याहून मुंबईला कंटेनर (क्र. एमएच- ४३, सीई- ३२८९) घेऊन चालला होता. बोरघाटातील खोपोली एक्झिटजवळ आल्यावर उतारावर चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले आणि या भरधाव कंटेनरने समोर असलेल्या वाहनांना एकापाठोपाठ एक धडक देण्यास सुरुवात केली. सलगपणे चार वाहनांना जोरदार धडक देऊन कंटेनर डाव्या बाजूला उलटला. एका कारवर जाऊन पडला. हा अपघात एवढा भीषण होता की, कारमधील सर्वजण दबले गेले. त्यानंतर पोलिसांनी जखमींना बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या दवाखान्यात दाखल केले. त्यात तिघांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. पाच जखमींवर उपचार सुरू आहेत. त्यात कंटेनरचालक अवधेश यादवचाही समावेश आहे.
हेही वाचा – एक महिन्याच्या विश्रांतीनंतर शरद पवार बारामतीत; विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीला उपस्थित
अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी
अपघातानंतर आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट महामार्ग वाहतूक पोलिस यंत्रणा, खोपोली पोलिस स्टेशनची यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, मृत्युंजय देवदूत आणि हेल्प फाउंडेशनच्या पथकाकडून तत्काळ बचावकार्य सुरू केले. भीषण अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र, पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी खोपोली पोलिस ठाण्यात कंटेनरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तपास सुरू आहे.


