पुणे : पिंपरी- चिंचवड शहरातील इंद्रायणी नदी पात्रातील अनाधिकृत बंगल्यांविरोधात महापालिकेने मोठी कारवाई केली आहे. निळ्या पूर रेषेत उभारण्यात आलेल्या ३६ अनाधिकृत बंगल्यांवर पालिकेने बुलडोझर चालवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आज कारवाई सुरू केली आहे. या तोडकाम कारवाईमध्ये पालिकेचे कर्मचारी मोठ्यासंख्येत सहभागी झाले आहेत. या कारवाईमुळे या बंगल्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.
काय आहे प्रकरण?
चिखली येथील इंद्रायणी नदीपात्रात झरे वर्ल्ड बिल्डरकडून निळ्या पूर रेषेत अनाधिकृत ओपन प्लॉटिंग करण्यात आली होती. या ओपन प्लॉटिंगवर जवळपास ३६ जागा मालकांनी कोट्यावधी रुपये खर्च करून आलिशान बंगले बांधले होते.हे बंगले नदीपात्रातील निळ्या पूर रेषेत अनधिकृत पणे उभारण्यात आल्याने या प्रकरणात तक्रारदार आणि बंगले मालक हे राष्ट्रीय हरित लवाद आणि सर्वोच्च न्यायालयात गेले होते. या खटल्याच्या अंतिम निकालात सर्वोच्च न्यायालयाने ३१ मे २०२५ पर्यंत सर्व अनधिकृत बंगले पाडून नदीपात्रातील भराव आणि राडारोडा पूर्णपणे उचलण्याचे आदेश पिंपरी चिंचवड महापालिकेला दिले होते.
आज सकाळपासून पिंपरी- चिंचवड महापालिका मोठी विश्लेषणाची कारवाई करत आहे. हे सर्व बंगले जमिनदोस्त करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आता इंद्रायणी नदीपात्र मोकळे झाले.


